Alireza Arafi : अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या भीषण हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. देशाचा नवा सर्वोच्च नेता निवडला जाईपर्यंत राज्यकारभार चालवण्यासाठी आता एका तात्पुरत्या ‘नेतृत्व परिषदे’ची स्थापना करण्यात आली आहे. या परिषदेत धर्मतज्ज्ञ सदस्य म्हणून अलिरेझा अराफी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे.
कोण आहेत अलिरेझा अराफी?
अलिरेझा अराफी हे इराणच्या शक्तिशाली ‘गार्डियन कौन्सिल’चे सदस्य आहेत. नव्या नियुक्तीनुसार, आता अराफी हे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि मुख्य न्यायाधीश घोलामहोसेन मोहसेनी एजेई यांच्यासोबत या अंतरिम परिषदेचे कामकाज पाहतील. जोपर्यंत ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’ खामेनी यांच्या वारसाची निवड करत नाही, तोपर्यंत ही परिषद सर्वोच्च नेत्याच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणार आहे.
तेहरानमध्ये संमिश्र प्रतिक्रिया
खामेनी यांच्या मृत्यूची बातमी अधिकृतपणे जाहीर होण्यापूर्वीच तेहरानच्या काही भागांत शनिवारी रात्री फटाके फोडून आणि संगीत वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये काही नागरिक शिट्ट्या वाजवून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.
मात्र, जानेवारी महिन्यात झालेल्या आंदोलनावरील कडक कारवाईमुळे लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येण्यास घाबरत आहेत. दुसरीकडे, एंगेलाब स्क्वेअरमध्ये मोठ्या संख्येने लोक काळे कपडे घालून जमा झाले होते. यावेळी अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने देशात 40 दिवसांचा दुखवटा आणि 7 दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
जागतिक नेत्यांच्या प्रतिक्रिया
- राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान: खामेनी यांची हत्या म्हणजे अमेरिका आणि इस्रायलने मुस्लिमांविरुद्ध पुकारलेले युद्ध आहे.
- डोनाल्ड ट्रम्प: खामेनी हे इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक होते. त्यांच्या जाण्यामुळे इराणी जनतेला आपला देश पुन्हा ताब्यात घेण्याची संधी मिळाली आहे.
- बेंजामिन नेतन्याहू: खामेनी हे एक अत्याचारी हुकूमशहा होते ज्यांनी दहशत पसरवली. आता इराणी जनतेने ही सत्ता उलथवून टाकली पाहिजे.
- रेझा पहलवी: खामेनी यांच्या मृत्यूमुळे इस्लामिक प्रजासत्ताकाचा अंत झाला असून आता लोकशाहीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ने या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली असून, संपूर्ण पश्चिम आशियामध्ये तणाव टोकाला पोहोचला आहे.










