‘… नाहीतर पाकिस्तानात घुसून मारू’, जयशंकर यांचा थेट इशारा

S Jaishankar Warning To Pakistan Conflict

S Jaishankar Warning To Pakistan Conflict | पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले आहे. पुन्हा कोणताही दहशतवादी हल्ला झाल्यास सडेतोड उत्तर दिले जाईल, असे भारताने वारंवार स्पष्ट केले आहे. आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा कठोर इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर पाकिस्तानमधून भारतावर दहशतवादी हल्ले सुरूच राहिले, तर भारत शांत बसणार नाही. अशा वेळी भारत ‘पाकिस्तानात खोलवर घुसून’ प्रतिहल्ला करेल, आणि तो फक्त दहशतवाद्यांवर नाही, तर त्यांच्या नेतृत्वावर देखील केला जाईल, असे ते म्हणाले.

युरोप दौऱ्यावर असलेल्या जयशंकर यांनी ब्रुसेल्समध्ये दिलेल्या भाषणात भारताच्या ‘दहशतवादाविरोधातील शून्य-सहिष्णुता’ धोरणाचा पुनरुच्चार केला. एका मुलाखतीत ते म्हणाले की, “आम्ही दहशतवादी हल्ले सहन करणार नाही. त्यामुळे आमचा पाकिस्तानला संदेश आहे की, जर त्यांनी एप्रिलमध्ये केलेल्या क्रूर हल्ल्यासारखे कृत्य करणे सुरू ठेवले, तर प्रतिहल्ला होईल आणि तो प्रतिहल्ला दहशतवादी संघटना आणि त्यांच्या नेतृत्वावर असेल. ते कुठे आहेत याची आम्हाला पर्वा नाही. जर ते पाकिस्तानात खोलवर असतील, तर आम्ही पाकिस्तानात खोलवर जाऊ.”

अलीकडील संघर्ष थांबला असला तरी, जयशंकर यांनी इशारा दिला की, मूळ समस्या अजूनही सुटलेली नाही. त्यांनी पाकिस्तानला “दहशतवादाचा राज्याच्या धोरणाचे एक साधन म्हणून वापर करणारा देश” असे संबोधले.

जयशंकर यांच्या मते, भारताच्या हवाई कारवायांमुळे पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागले. भारताच्या लढाऊ विमानांनी आणि क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या आठ मुख्य हवाई तळांवर हल्ला करत ते उद्ध्वस्त केले. “यामुळेच पाकिस्तानला 10 तारखेला शांतता चर्चेसाठी पुढे यावे लागले”, असेही जयशंकर म्हणाले.

दरम्यान, युरोप दौऱ्यात जयशंकर यांची युरोपियन युनियन, बेल्जियम व फ्रान्सच्या नेत्यांशी भेट होणार आहे. या दौऱ्याचा उद्देश द्विपक्षीय संबंध बळकट करणे आणि दहशतवादाविरोधातील सहकार्य वाढवणे आहे.