Air Ambulance Crash: झारखंडमधील चत्रा जिल्ह्यात एका खासगी एअर ॲम्ब्युलन्सला भीषण अपघात झाला. रांचीहून दिल्लीच्या दिशेने झेपावलेले हे विमान सिमरियाजवळ कोसळले असून, या दुर्घटनेत विमानातील सर्व ७ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी प्रशासनाने केली आहे. मृतांमध्ये एक रुग्ण, त्याचे दोन नातेवाईक, दोन डॉक्टर आणि दोन वैमानिकांचा समावेश आहे.
नेमकी घटना काय?
रेडबर्ड एअरवेजच्या मालकीचे ‘बीचक्राफ्ट C90’ या विमानाने सोमवारी संध्याकाळी 7 वाजून 11 मिनिटांनी रांची विमानतळावरून उड्डाण केले होते. लातेहारमधील रहिवासी असलेले संजय कुमार हे ६५ टक्के भाजलेले असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी दिल्लीला नेले जात होते. मात्र, उड्डाणानंतर अवघ्या २० मिनिटांतच विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला आणि ते चत्रा जिल्ह्यातील दुर्गम भागात कोसळले.
मृतांची ओळख आणि शोधकार्य
चत्राच्या जिल्हाधिकारी कीर्तीश्री जी. यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणालाही वाचवता आले नाही. मृतांमध्ये मुख्य वैमानिक कॅप्टन विवेक विकास भगत, सह-वैमानिक कॅप्टन सवराजदीप सिंह, रुग्ण संजय कुमार, त्यांचे नातेवाईक अर्चना देवी आणि धुरु कुमार, डॉक्टर विकास कुमार गुप्ता आणि पॅरामेडिक सचिन कुमार मिश्रा यांचा समावेश आहे. स्थानिक पोलिसांनी सर्व ७ मृतदेह ताब्यात घेतले असून ते विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
अपघाताचे संभाव्य कारण
नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणानंतर वैमानिकाने खराब हवामानामुळे मार्ग बदलण्याची विनंती केली होती. रात्री 7 वाजून 34 मिनिटांनी कोलकाता रडारशी विमानाचा संपर्क कायमचा तुटला. रांची विमानतळाचे संचालक विनोद कुमार यांनी सांगितले की, मुसळधार पाऊस किंवा धुक्यामुळे हा अपघात झाला असावा, मात्र नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होईल. ‘एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो’चे (AAIB) पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
विमान वाहतूक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
गेल्या काही काळातील हा दुसरा मोठा विमान अपघात आहे. २८ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील बारामतीमध्ये झालेल्या अपघातात अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा चार्टर्ड आणि एअर ॲम्ब्युलन्स सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या सुरक्षेबाबत आणि नियमावलीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.












