Justice BR Gavai Retirement Speech : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बी. आर गवई लवकरच निवृत्त होणार आहेत. निरोप समारंभात बोलताना गवई यांनी आपल्या जीवनभराच्या विचारधारेबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.
देशाच्या न्यायव्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी आपण बौद्ध धर्माचे पालन करत असलो तरी, प्रत्येक धर्माबद्दल समान आदर बाळगणारे खरे धर्मनिरपेक्ष व्यक्ती असल्याचे सांगितले. न्यायमूर्ती गवई 23 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असून, शुक्रवार हा त्यांचा सर्वोच्च न्यायालयातील शेवटचा कार्यदिवस आहे.
धर्मनिरपेक्षतेबद्दल स्पष्ट मत
समारंभात बोलताना त्यांनी सांगितले, “मी कोणत्याही धर्माचा सखोल अभ्यास केलेला नाही, पण हिंदू, शीख, मुस्लीम, ख्रिस्ती सर्वांवर माझा समान विश्वास आहे. ही शिकवण मला माझ्या वडिलांकडूनच मिळाली.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा उल्लेख करून त्यांनी स्पष्ट केले की, संविधानामुळेच एका नगरपालिका शाळेत जमिनीवर बसून शिक्षण घेणाऱ्या मुलाला सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात उंच पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळू शकते. “न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता—या चार मूल्यांना मी आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न केला,” असे त्यांनी नमूद केले.
सर्वोच्च न्यायालय एका व्यक्तीपुरते मर्यादित नाही
गवई यांनी हे देखील स्पष्ट केले की सर्वोच्च न्यायालय ही केवळ मुख्य न्यायाधीश-केंद्रित संस्था नाही. हे सर्व न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि नोंदणी विभाग यांनी एकत्र येऊन चालवलेले एक मोठे कुटुंब आहे.
या समारंभास उपस्थित असलेले मुख्य न्यायाधीश-निर्वाचित न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी गवईंच्या कार्यकाळाचे कौतुक केले. त्यांनी न्यायमूर्ती गवईंना न्यायासाठी सतत झटणारे, सहृदयी आणि स्नेही व्यक्तिमत्त्व असे वर्णन केले. वकिलांवर तपास यंत्रणांकडून होणाऱ्या चौकशीच्या विषयाची दखल घेतल्याबद्दल SCAORA अध्यक्षांनीही न्यायमूर्ती गवईंचे आभार मानले.
हे देखील वाचा – MG Windsor EV : ‘या’ इलेक्ट्रिक कारने सर्वांनाच लावले वेड, 50 हजार लोकांनी खरेदी केली गाडी; किंमत-वैशिष्ट्ये जाणून घ्या









