LPG Crisis: मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. याचा थेट परिणाम भारताच्या स्वयंपाकघरांवर होताना दिसत आहे. गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे आणि वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिक आता पर्यायी मार्गांचा अवलंब करत आहेत, ज्यामुळे इंडक्शन स्टोव्ह आणि इलेक्ट्रिक शेगड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
प्रमुख शहरांत ‘हाऊसफुल्ल’ परिस्थिती
मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये सध्या इंडक्शन स्टोव्ह मिळणे दुर्मिळ झाले आहे. क्विक कॉमर्स ॲप्सवर अनेक भागांत हे उपकरण ‘आऊट ऑफ स्टॉक’ दाखवत आहे.
- मुंबई: पवई आणि जुहू सारख्या भागांत इंडक्शन शेगड्यांचा साठा संपला आहे.
- दिल्ली: ग्रेटर कैलास आणि कालकाजीमध्येही दुकानांमधील साठा पूर्णपणे रिकामा झाला आहे.
- बेंगळुरू आणि चेन्नई: एम.जी. रोड, अशोक नगर आणि कोडंबक्कम येथेही ग्राहकांना इंडक्शन शेगड्या शोधण्यासाठी कसरत करावी लागत आहे. केवळ स्टोव्हच नाही, तर इंडक्शनवर चालणारी भांडी घेण्यासाठीही बाजारात ग्राहकांची झुंबड उडाली आहे.
गॅसच्या किमतीत मोठी वाढ
अनेक ठिकाणी अनधिकृत बाजारात (ब्लॅक मार्केट) गॅस सिलिंडरसाठी २,००० ते ३,००० रुपये मोजावे लागत आहेत. या परिस्थितीचा फटका लहान विक्रेत्यांना आणि हॉटेल व्यावसायिकांनाही बसला आहे. अनेक ठिकाणी हॉटेल चालकांनी गॅसचा वापर कमी करण्यासाठी डोसा, पुरी यांसारख्या पदार्थांचे प्रमाण मर्यादित केले आहे, तर काही ठिकाणी जेवणाचे दर ५० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
सरकारची भूमिका आणि उपाय
ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने ‘अत्यावश्यक वस्तू कायदा’ लागू केला आहे. गॅसचा साठा सुरक्षित राहावा आणि होर्डिंग रोखली जावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सरकारने पुरवठा पुरेसा असल्याचा दावा केला असला तरी, नागरिकांमधील भीती कमी होताना दिसत नाही.









