West Asia conflict: पश्चिम आशियात भडकलेल्या युद्धामुळे तिथल्या विविध देशांत अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च ते ७ मार्च या अवघ्या सात दिवसांच्या कालावधीत ५२,००० पेक्षा जास्त भारतीयांना मायदेशी आणण्यात यश आले आहे.
विमान कंपन्यांची मोठी मदत
या बचाव मोहिमेमध्ये भारतीय आणि परदेशी विमान कंपन्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. एकूण प्रवाशांपैकी ३२,१०७ नागरिकांनी भारतीय विमान कंपन्यांच्या विमानांतून प्रवास केला, तर उर्वरित प्रवाशांना परदेशी एअरलाईन्सच्या मदतीने भारतात आणण्यात आले. गेल्या काही दिवसांत या भागातील हवाई क्षेत्र अंशतः खुले झाल्यामुळे नियमित आणि विशेष विमानांचे उड्डाण करणे शक्य झाले, ज्यामुळे अडकलेल्या प्रवाशांचा मार्ग मोकळा झाला.
सरकारचे २४ तास लक्ष
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, भारत सरकार पश्चिम आशियातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. विशेषतः जे भारतीय नागरिक ट्रांझिटमध्ये किंवा छोट्या भेटीसाठी तिथे गेले होते, त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सरकारने खालील पावले उचलली आहेत:
- २४/७ हेल्पलाईन: प्रभावित देशांमधील भारतीय दूतावासांनी २४ तास सुरू राहणाऱ्या हेल्पलाईन सुरू केल्या आहेत.
- स्पेशल कंट्रोल रूम: नवी दिल्लीत एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, तो अडकलेले प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या शंकांचे निरसन करत आहे.
- मार्गदर्शक सूचना: सर्व भारतीयांना स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे आणि भारतीय दूतावासाच्या सल्ल्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील नियोजन काय?
ज्या देशांमध्ये अद्याप व्यावसायिक उड्डाणे सुरू झालेली नाहीत, तिथल्या भारतीयांना थेट दूतावासाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. लवकरच आणखी काही विमानांचे नियोजन करण्यात आले असून, अद्याप मायदेशी येण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रत्येक भारतीयाला सुरक्षित आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.









