Mohan Bhagwat on Hindu Rashtra : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी ‘हिंदू’ या संकल्पनेला केवळ धार्मिक नव्हे, तर सभ्यता आणि संस्कृतीशी जोडलेली ओळख म्हणून परिभाषित केले आहे. गु
वाहाटी येथील कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी स्पष्ट केले की, जे लोक आपल्या देशावर म्हणजे भारतावर गर्व करतात, ते सर्व हिंदू आहेत. भारत आणि हिंदू हे समानार्थी असून, भारत स्वाभाविकपणेच ‘हिंदू राष्ट्र’ असल्याचे त्यांनी सांगितले.
घोषणा करण्याची गरज नाही
भागवत म्हणाले की, भारताला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून अधिकृतपणे घोषित करण्याची कोणतीही गरज नाही. कारण, देशाची सभ्यता हजारो वर्षांपासून ही ओळख स्पष्टपणे दर्शवत आहे. हिंदू हा शब्द केवळ पूजा-अर्चा किंवा धर्मापुरता मर्यादित नसून, तो हजारो वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडलेला एक सभ्यतागत भाव आहे.
संघाच्या स्थापनेमागील उद्देश
संघप्रमुखांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला. संघ कोणाचाही विरोध करण्यासाठी किंवा नुकसान करण्यासाठी उभा राहिलेला नाही, तर चारित्र्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून भारताला जागतिक नेता बनविण्यात योगदान देण्यासाठी त्याची स्थापना झाली. विविधतेने भरलेल्या भारताला एकत्र ठेवण्याची पद्धत म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, असे ते म्हणाले.
लोकसंख्या आणि घुसखोरीवर चिंता
भागवत यांनी आसाममध्ये होत असलेल्या लोकसंख्या बदलांवर आणि अवैध घुसखोरीच्या मुद्द्यावरही चिंता व्यक्त केली. त्यांनी समाजात आत्मविश्वास आणि सतर्कता असण्याचे तसेच आपल्या भूमी आणि संस्कृतीशी मजबूत बांधिलकी ठेवण्याचे आवाहन केले. विभाजनकारी धर्मांतराला विरोध करणे आणि हिंदूंसाठी तीन अपत्यांच्या निकषासह संतुलित लोकसंख्या धोरण आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी निःस्वार्थ भावनेने एकत्र काम करण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.
हे देखील वाचा – Cloudflare नक्की काय आहे? यातील समस्येमुळे जगभरातील ऑनलाइन सेवा का बंद पडल्या? वाचा









