MP Priyanka Chaturvedi : उबाठा गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (MP Priyanka Chaturvedi) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना पत्र लिहून भारतीय लोकशाहीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या पत्रातून सत्ताधारी भाजपाप्रणीत एनडीए सरकारवर जोरदार टीका करताना त्यांनी राष्ट्रपतींना सरकारच्या हातातील कठपुतळी न होण्याचा सल्ला दिला आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रात म्हटले आहे की, लोकशाहीत सत्ताधारी व विरोधक या दोन्ही अंगांची भूमिका समान महत्त्वाची आहे आणि घटनात्मक तत्वे जपणे हे राष्ट्रपतींचे दायित्व आहे. परंतु, रशियन अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्याच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात आयोजित स्नेहभोजनात विरोधी पक्षनेत्यासह इतर अनेक पक्षाच्या नेत्यांना निमंत्रित न करणे ही लोकशाहीसाठी दुर्दैवी बाब आहे. सरकारने विरोधकांना दूर ठेवण्यासाठी ही परंपरा मोडली आहे. राष्ट्रपती हे पद फक्त सत्ताधारी पक्षाचे नसून संपूर्ण देशाचे व संविधानाचे सर्वोच्च प्रतीक आहे. परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेले राजकीय भोजन सर्वपक्षीय असते. विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण देणे ही अनेक दशकांपासून चालत आलेली परंपरा आहे आणि ती मोडणे लोकशाहीसाठी खीळ बसवण्यासारखे आहे. सरकारच्या विरोधकांकडे दुर्लक्ष करून विरोधकांना सरकारी कार्यक्रमांपासून वंचित ठेवणे लोकशाहीच्या मूळ तत्त्वांविरुद्ध आहे आणि त्यामुळे राष्ट्रपतींनी सत्ताधारी पक्षाची कठपुतळी बनू नये.









