तिरुवनंतपुरम – केरळमध्ये राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात नवीन वाद उफाळून आला आहे. राजभवनातील अधिकृत कार्यक्रमांमध्ये भारत माताची प्रतिमा भगव्या ध्वजासह प्रदर्शित केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Kerala CM Pinarayi Vijayan) यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (Governor Rajendra Arlekar) यांना पत्र लिहून मंत्रिमंडळाच्या नाराजीचा सूर नोंदवला आहे. मुख्यमंत्री विजयन यांनी पत्रात स्पष्ट केले की, अशा प्रतिमा संविधानाशी सुसंगत नाहीत आणि त्या अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये वापरणे अनुचित आहे.
काही दिवसापूर्वी शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी स्काउट आणि गाईडच्या एका कार्यक्रमात भारतमातेच्या प्रतिमेवर बहिष्कार टाकत सभात्याग केला होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सरकारी कार्यक्रमांमध्ये कोणतेही पक्षपाती वा धार्मिक चिन्ह वापरू नयेत. यावर राजभवनाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्या कृतीला शिष्टाचाराचा भंग आणि राज्यपालांचा अपमान असल्याचे म्हटले. मात्र मुख्यमंत्र्यांनी शिवनकुट्टी यांच्या भूमिकेचे समर्थन करत म्हटले की, सरकारी मंच हा धर्मनिरपेक्ष आणि तटस्थ असला पाहिजे. भारत मातेचा सन्मान न करण्याचा प्रश्न नाही पण जी प्रतिमा वापरण्यात आली ती आणि तिच्यातील झेंडा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. त्यामुळे ती सर्वांवर लादता येणार नाही. या प्रकरणामुळे केरळमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी काही ठिकाणी निदर्शनेही झाली.