Rahul Gandhi Criticizes RSS | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे (RSS leader Dattatreya Hosabale) यांनी संविधानाच्या (Constitution) प्रस्तावनेतील ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द काढून टाकण्याबाबत विचार करावा अशी मागणी केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. हे शब्द आणीबाणीच्या काळात जोडले गेले असून, ते बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या मूळ संविधानाचा भाग नव्हते, असे होसबाळे हे म्हणाले होते आहे.
यावर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी RSS आणि भाजपववर जोरदार हल्ला चढवला असून, त्यांना संविधान नको, तर ‘मनुस्मृती’ हवी असल्याचा आरोप केला आहे.
होसबाळेंचे वक्तव्य: संविधानावर प्रश्नचिन्ह
आणीबाणी लागू करण्यात आलेल्या घटनेला नुकतीच 50 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना होसबाळे म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या प्रस्तावनेत ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द नव्हते. आणीबाणीच्या काळात, जेव्हा मूलभूत हक्क निलंबित होते, संसद बंद होती आणि न्यायव्यवस्था कमकुवत झाली होती, तेव्हा हे शब्द जोडण्यात आले.” त्यांनी हे शब्द काढण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नसल्याचेही स्पष्ट केले, पण त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वादाला तोंड फोडले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत RSS वर तीव्र टीका केली. ते म्हणाले, “RSS चा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यांना संविधान खटकते, कारण ते समानता, धर्मनिरपेक्षता आणि न्याय यांच्याबद्दल बोलते. RSS आणि BJP यांना संविधान नको आहे, त्यांना मनुस्मृती हवी आहे.
त्यांचा खरा अजेंडा हा गरीब आणि दुर्बलांचे हक्क हिसकावून त्यांना पुन्हा गुलाम बनवण्याचा आहे. प्रत्येक देशभक्त भारतीय आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाचे रक्षण करेल.”, असे देखील ते म्हणाले.
काँग्रेससह राजद, आप आणि CPI(M) यांसारख्या विरोधी पक्षांनी होसबाळे यांच्या वक्तव्याला “संविधानाच्या आत्म्यावर हल्ला” असे संबोधले आहे. काँग्रेसने आरोप केला की, RSS ने कधीही संविधान स्वीकारले नाही आणि हे वक्तव्य बाबासाहेब आंबेडकरांच्या भारताच्या संकल्पनेला नष्ट करण्याचा प्रयत्न आहे.
दरम्यान, 1975 च्या आणीबाणीच्या काळात 42व्या घटनादुरुस्तीने ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द संविधानाच्या प्रस्तावनेत जोडले गेले. या शब्दांमुळे भारताच्या धर्मनिरपेक्ष आणि समतावादी तत्त्वांना बळकटी मिळाली, पण त्यावरून कायम वाद होत राहिला आहे. होसबाळे यांच्या वक्तव्याने हा वाद पुन्हा पेटला आहे.