500 Rupee Note Ban Claim | केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी अचानक नोटबंदी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा 500 रुपयांची नोट बंद केली जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, या चर्चांवर आरबीआयने स्पष्टीकरण दिले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने या चर्चांना पूर्णविराम देत स्पष्ट केलं आहे की, 500 रुपयांची नोट वैध चलन असून, ती मागे घेण्याचा कोणताही निर्णय सरकार किंवा RBI कडून झालेला नाही.
डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या सरकारी धोरणामुळे आणि छोट्या मूल्याच्या नोटाअधिक प्रमाणात छापण्याच्या हालचालींमुळे ही अफवा पसरल्याचं सांगितलं जात आहे.
RBI ने अलीकडेच 100 रुपये आणि200 रुपयांच्या नोटांची उपलब्धता वाढवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे काहींच्या मनात 500 रुपये ची नोट आता बाद होणार अशी भीती निर्माण झाली. मात्र, हे निर्देश केवळ लहान सुट्ट्या पैशांच्या तुटवड्यामुळे देण्यात आले होते, असे स्पष्टीकरण अधिकार्यांकडून देण्यात आले. 500 रुपयांची नोट चलनातून काढण्याबाबत कोणताही प्रस्ताव RBI च्या विचाराधीन नाही.
सद्यस्थितीत नवीन 500 रुपयांच्या नोटा छापल्या जात आहेत आणि त्या व्यवहारातही मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. दीर्घकालीन धोरण म्हणून उच्च मूल्याच्या नोटांवरचा अवलंब कमी करण्याची दिशा असली तरी,500 रुपयांची नोट सध्या काढण्याचा कुठलाही विचार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका सेमिनारमध्येबोलताना सांगितलं की, “2,000 रुपयांच्या नोटा जवळपास संपूर्णपणे चलनातून बाहेर पडल्या असून, 500 रुपयांच्या नोटा मात्र वापरातच राहतील.”
PIB ने अफवांचे केले खंडन
‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ने एका व्हायरल यूट्यूब व्हिडिओचा दावा फेटाळून लावला आहे, ज्यात सांगण्यात आलं होतं की 500 रुपयांच्या नोटा मार्च 2026 पासून बंद केल्या जातील. पीआयबीने हा दावा नाकारत म्हटले आहे की, आरबीआयने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. ₹500 च्या नोटा कायदेशीर चलन राहतील आणि त्या चलनातून मागे घेण्याची कोणतीही योजना नाही.