IndiGo flight cancel- इंडिगो एअरलाइन्सची (IndiGo flight cancel)उड्डाणे रद्द झाल्याने उडालेल्या गोंधळाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज चिंता व्यक्त केली . मात्र तातडीने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने म्हटले की, विमानतळांवर अनेक लोक अडकले आहेत आणि काहींना आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. केंद्र सरकारने प्रकरणाची दखल घेतली असल्याने आत्ताच न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक नाही . सरकारने वेळेवर कारवाई केली आहे आणि परिस्थिती हाताळण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सुनावणीवेळी एका वकिलाने सांगितले की, इंडिगोमध्ये अनेक पदे रिक्त आहेत आणि या कारणास्तव प्रवाशांना त्रास होतो आहे. ग्राहकांना योग्य माहिती मिळत नाही, ज्यामुळे गोंधळ अधिक वाढतो.
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणावर दुसरी याचिका दाखल झाली आहे. या याचिकेत प्रवाशांनी तिकिटांचे पैसे परत देण्याची मागणी केली आहे. याचिकेत असेही सांगितले गेले की विमानतळांवर अडकलेल्या लोकांना कोणतीही मदत मिळत नाही आणि रिफंड प्रक्रियाही होत नाही. दिल्ली उच्च न्यायालय पुढील सुनावणी बुधवार १० डिसेंबर रोजी घेणार आहे.
इंडिगोची अनेक उड्डाणे आज सातव्या दिवशीही रद्द झाली. दिल्ली आणि बेंगळुरू विमानतळांवर सर्वाधिक परिणाम झाला असून, दिल्ली विमानतळावरून ७५ रवाना आणि ५९ आगमन अशा एकूण १३४ उड्डाणे रद्द झाली. बंगळूरु विमानतळावरून १२७ उड्डाणे रद्द झाली. त्याचबरोबर, हैद्राबादमध्ये ७७, जम्मूमध्ये २०, काश्मीरमध्ये १६, चेन्नईमध्ये ७१, अहमदाबादमध्ये ३६तर मुंबई आणि पुण्यातही अनेक उड्डाणे रद्द झाली. त्यामुळे आजही हजारो प्रवासी अडकले असून त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.









