Toll Rates Hike: नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. देशभरातील प्रमुख महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरील टोलच्या दरात 1 एप्रिल 2026 पासून सुमारे 5 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या दरवाढीसोबतच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने टोल संकलनाबाबत एक मोठा बदल केला आहे. आता टोल नाक्यांवर रोख स्वरूपात पैसे स्वीकारले जाणार नाहीत. प्रवाशांना केवळ युपीआय किंवा फास्टॅगच्या माध्यमातूनच टोल भरावा लागणार आहे.
प्रमुख मार्गांवरील नवीन दर काय?
1. दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे: या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आता सरासरी 5 टक्के अधिक टोल द्यावा लागेल. कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या हलक्या वाहनांसाठी टोलचा दर 175 रुपये असेल, तर परतीच्या प्रवासासाठी 265 रुपये मोजावे लागतील.
2. कर्नाटक आणि तमिळनाडू: कर्नाटकातील बेंगळुरू-मैसूर एक्सप्रेसवे आणि बेंगळुरू विमानतळ रस्त्यावरील टोलमध्ये 3 ते 5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तमिळनाडूमधील ईस्ट कोस्ट रोड आणि मदुराई रिंग रोडवरील प्रवासासाठीही आता जास्तीचे पैसे द्यावे लागतील.
3. गुजरात (NH48): दिल्ली-मुंबई कॉरिडॉरवरील महत्त्वाच्या भरथाना टोल प्लाझावरही दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. येथे ट्रक, बस आणि अवजड वाहनांसाठी टोल वाढवण्यात आला आहे, मात्र कार आणि जीपसाठीचे दर सध्या तरी कायम ठेवण्यात आले आहेत.
रोख व्यवहार पूर्णपणे बंद
टोल नाक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी आता ‘कॅश पेमेंट’ पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ज्या वाहनांवर फास्टॅग नसेल किंवा ज्यांना डिजिटल पेमेंट करता येणार नाही, त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपला फास्टॅग वेळेत रिचार्ज करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










