India Population 2025 | भारताची लोकसंख्या 2025 अखेरपर्यंत 1.46 अब्जांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरेल. ही माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) नवीन लोकसंख्याशास्त्रीय अहवालात समोर आली आहे. विशेष म्हणजे, या अहवालात भारताचा एकूण प्रजनन दर (Total Fertility Rate – TFR) ‘रिप्लेसमेंट रेट’पेक्षा खाली गेला असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) च्या ‘State of World Population 2025’ या अहवालाला ‘The Real Fertility Crisis’ असे नाव देण्यात आले आहे. लोकसंख्या घटण्याच्या चिंतेतून लोकांच्या ‘अपूर्ण प्रजनन उद्दिष्टांकडे’ लक्ष देण्याचे आवाहन करतो. कोट्यवधी लोकांना त्यांची खरी प्रजनन उद्दिष्ट्ये साध्य करता येत नाहीत, असे या अहवालात म्हटले आहे.
भारताचा एकूण प्रजनन दर सध्या 1.9 इतका आहे, जो 2.1 च्या प्रतिस्थापन दरापेक्षा कमी आहे. याचा अर्थ, स्थलांतराशिवाय (Migration) एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे लोकसंख्येचा आकार कायम ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या मुलांपेक्षा भारतीय महिलांना सरासरी कमी मुले होत आहेत. मात्र, भारताची तरुण लोकसंख्या अजूनही भक्कम आहे. देशातील 68% लोकसंख्या ही कार्यक्षम वयोगटात (15-64) असून, 26% लोकसंख्या 10-24 वयोगटातील आहे.
वृद्धांची टक्केवारी (65 वर्षांवरील) सध्या 7% असून, आयुर्मान वाढल्यामुळे ही संख्या येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. 2025 पर्यंत भारतात पुरुषांचे आयुर्मान 71 वर्षे आणि महिलांचे 74 वर्षांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
इतिहास पाहता, 1960 साली भारताची लोकसंख्या 436 दशलक्ष होती आणि सरासरी प्रत्येक महिलेला सुमारे 6 मुले होत असत. त्या काळी शिक्षण, आरोग्य सेवा आणि प्रजनन हक्क फारच मर्यादित होते. आज महिलांना अधिक पर्याय आहेत, शिक्षण व आरोग्याची उपलब्धता वाढली आहे, आणि सरासरी प्रजनन दर 2 पर्यंत खाली आला आहे.
UNFPA च्या भारत प्रतिनिधी ॲंड्रिया एम. वोजनार यांनी सांगितले की, “भारताने प्रजनन दरात लक्षणीय घट केली आहे, त्यामुळे मातामृत्यू दरात मोठी घट झाली आहे. मात्र, अजूनही राज्यांदरम्यान, जाती-धर्मांमध्ये आणि उत्पन्न गटांमध्ये असमानता कायम आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, “खरा लोकसंख्याशास्त्रीय लाभ तेव्हाच मिळेल, जेव्हा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रजनन हक्कांबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि साधने मिळतील.”