India Pakistan Conflict : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकस्थित दहशतवादी तळे उद्धवस्त केली होती. या घटनेला जवळपास 6 महिने उलटले असून, भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या संघर्षानंतरही, सीमेवरील भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्याच्या आणि धाडसाच्या कहाण्या प्रेरणा देत आहेत.
7 मे च्या मध्यरात्रीनंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) यशस्वीरित्या पार पाडले आणि पाकिस्तानच्या भूमीवरील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या कारवाईनंतर काही तासांतच, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील उरी जलविद्युत प्रकल्पांवर गोळीबार करून बदला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) धैर्यामुळे पाकिस्तानचा हा प्रयत्न पूर्णपणे असफल झाला.
नुकतेच, नियंत्रण रेषेवर (LoC) तैनात असलेल्या उरी जलविद्युत प्रकल्पांना (UHEP-I आणि II) सुरक्षा देणाऱ्या CISF च्या 19 जवानांना त्यांच्या ‘अभूतपूर्व’ शौर्यासाठी महानिदेशक डिस्कने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि 250 नागरिकांचे प्राण वाचवण्याच्या त्यांच्या योगदानामुळे ही शौर्यगाथा समोर आली.
पाकिस्तानी हल्ल्याला CISF ने कसे तोंड दिले?
7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर, उरी प्रकल्पाच्या परिसरातील CISF कर्मचाऱ्यांनी तातडीने हाय अलर्ट जारी करून सर्व दिवे बंद केले.
काही तासांतच, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरून तीव्र आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला आणि लक्षणीय प्रमाणात ड्रोनचा वापर केला. बारामुल्ला जिल्ह्यातील झेलम नदीवरील उरी जलविद्युत प्रकल्पाचे मोठे नुकसान करणे हे पाकिस्तानचे उद्दिष्ट होते.
कमांडंट रवी यादव यांच्या नेतृत्वाखालील 19 जवानांच्या टीमने प्रसंगावधान राखले. पुरस्कार विजेते एएसआय गुरजीत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आमच्या जवानांनी उरी II प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ शत्रूचे ड्रोन जॅम करून पाडले.” या हल्ल्यात प्रकल्पाचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.
पाकिस्तानी गोळीबार जवळच्या निवासी संकुलांवर होत असताना, CISF च्या जवानांनी 250 नागरिक आणि NHPC च्या कर्मचाऱ्यांचे दारोदार जाऊन स्थलांतर केले. या अत्यंत धोकादायक बचावकार्यात कोणाचेही प्राण गेले नाहीत.
CISF च्या निवेदनानुसार, जवानांनी धोक्याचे त्वरित विश्लेषण केले, बंकर्सची मजबुती केली आणि अत्यंत गंभीर परिस्थितीतही दळणवळण कायम राखले.
उरी येथील 2016 चा हल्ला
उरी येथे झालेला हा दुसरा मोठा हल्ला होता. यापूर्वी 18 सप्टेंबर 2016 रोजी, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी लष्करी तळावर हल्ला केला होता, ज्यात 19 जवान शहीद झाले होते. यानंतर 9 दिवसांनी भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा (LoC) ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता.
हे देखील वाचा – तुमच्या नावावरील SIM Card दुसरे कोणीतरी वापरत आहे? नियमांचे उल्लंघन केल्यास होईल मोठी शिक्षा









