India US Relations: फ्रान्समधील ‘एव्हियन-ले-बॅन्स’ येथे आयोजित जी-7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय बैठक पार पडली. गेल्या 16 महिन्यांतील दोन्ही नेत्यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती.
गेल्या काही काळापासून व्यापारी शुल्क वाद, अमेरिकन हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा झालेला मृत्यू आणि इमिग्रेशनचे कडक नियम यांमुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले. तसेच “जोपर्यंत मोदी भारताचे नेतृत्व करत आहेत आणि भारतावर कोणताही हल्ला झाला, तर त्यांना मदत करण्यासाठी आम्ही नक्कीच तिथे उपस्थित राहू,” असे जाहीर आश्वासन ट्रम्प यांनी दिले.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दोन्ही नेत्यांची पहिलीच भेट
मे 2025 मध्ये झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच समोरासमोर भेट असल्याने याला जागतिक पातळीवर मोठे महत्त्व आहे:
- ८८ तासांचा संघर्ष: 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला होता. याला उत्तर म्हणून भारताने 7 मे 2025 रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले होते. दोन्ही देशांमधील हा लष्करी संघर्ष तब्बल 88 तास चालला होता.
- मध्यस्थीचा दावा फेटाळला: 10 मे रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला होता. या युद्धविरामात डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा दावा केला होता, मात्र हा निर्णय केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातच झाला होता, असे भारताने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी आता भारताला पाठिंबा जाहीर केला आहे.
“मोदी कडक व्यापारी आहेत”; ट्रम्प यांनी केली स्तुती
डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमधील घट्टपणा अधोरेखित केला. ते म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यात अतिशय उत्तम संबंध आहेत. आमच्या दोन देशांमध्ये यापेक्षा जास्त जवळीक असूच शकत नाही.
पंतप्रधान मोदींच्या वाटाघाटीच्या कौशल्याची स्तुती करताना ट्रम्प मिश्किलपणे म्हणाले, “मोदी हे व्यापाराच्या बाबतीत अतिशय कडक वाटाघाटी करणारे नेते आहेत. जोपर्यंत ते भारताचे नेतृत्व करत आहेत, तोपर्यंत भारत खूप प्रगती करेल.” पुढे हसत त्यांनी जोडले, “पण जर भारतात नवीन नेता आला, तर मदतीबाबत मी खात्री देऊ शकत नाही,” ज्यावर तिथे उपस्थित सर्वांमध्ये हशा पिकला.
भारतीय खलाशांच्या मृत्यूवर व्यक्त केले दुःख
ओमानजवळील समुद्रात अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यात ३ भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेवरून भारताने ४८ तासांत दोनदा अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना समन्स बजावून तीव्र निषेध नोंदवला होता.
या बैठकीत ट्रम्प यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. “मी या दुर्दैवी घटनेबद्दल ऐकले आहे. हे क्षेत्र खूप आव्हानात्मक आहे आणि आम्ही या समस्येवर काम करत आहोत,” असे ट्रम्प म्हणाले. या बैठकीमुळे अनेक प्रलंबित मुद्द्यांवर दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत होण्यास मदत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
हे देखील वाचा – Shiv Sena Political Crisis: “उद्धवजी, वहिनी आणि आदित्य… आता पक्षात तिघेच उरणार”; रामदास कदमांचा टोला









