शर्मिष्ठा पानोलीविरुद्ध तक्रार करणाऱ्या वजाहात खानला अटक, नक्की प्रकरण काय? जाणून घ्या

Wajahat Khan Arrest

Wajahat Khan Arrest | ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) नंतर एका विशिष्ट धर्माविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पानोलीला अटक करण्यात आली होती. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. आता, या प्रकरणात शर्मिष्ठाविरुद्ध तक्रार करणाऱ्या वजाहात खानला कोलकाता पोलिसांनीअटक केली आहे.

खानविरोधात द्वेषपूर्ण भाषण आणि धार्मिक भावना दुखावणे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो 1 जूनपासून फरार होता. अनेक समन्सनंतरही हजर न राहिल्यामुळे पोलिसांनी छापे टाकून त्याला अटक केली.

वजाहात खानवर कोणते आरोप?

वजाहात खान विरोधात कोलकात्यातील गोल्फ ग्रीन पोलीस ठाण्यात द्वेषपूर्ण भाषण पसरवणे आणि सोशल मीडियावरील त्याच्या कृतीतून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी त्याच्या गार्डन रीच येथील निवासस्थानी तीन नोटिसा बजावून त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, खान अटकेपर्यंत फरारच होता.

शर्मिष्ठा पानोली आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ वाद

30 मे रोजी कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम (Gurugram) येथून पानोलीला अटक केली होती. तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये एका धर्माविषयी अपमानास्पद भाषा वापरली होती. त्यानंतर तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीसुनावण्यात आली होती. तीने व्हिडिओ हटवत सार्वजनिक माफीमागितली होती.

वजाहात खानविरोधात नवा आरोप

पानोलीच्या अटकेनंतर वाजाहात खान बेपत्ता झाला होता. त्याचे वडील सादत खान यांनी दावा केला होता की, पानोलीचे जीवन उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत कुटुंबाला धमकीचे फोन येत आहेत. दरम्यान, श्री राम स्वाभिमान परिषदेने खानविरोधात कोलकाता पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

या तक्रारीनुसार खानने हिंदू देवता, धार्मिक परंपरा आणि हिंदू समुदायाविरोधात आक्षेपार्ह, प्रक्षोभक आणि अपमानास्पद भाषा वापरली. या प्रकरणी खानविरोधात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत कारवाईची मागणी झाली आहे.

पानोलीला जामीन, परंतु प्रवासावर निर्बंध

पानोलीला न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, तिला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगीशिवाय देश सोडण्याची परवानगी नाही. यापूर्वी न्यायालयाने म्हटले होते की, भाषणाचे स्वातंत्र्य निरपेक्ष नसते आणि कोणीही धार्मिक भावना दुखावू शकत नाही.