Interfaith Marriage | पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यात एका तरुणीने दुसऱ्या धर्मातील मुलासोबत पळून जाऊन विवाह केल्याने तिच्या कुटुंबाने जिवंतपणीच तिचे ‘श्राद्ध’ विधी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबियांनी तिच्या निर्णयामुळे बदनामी झाल्याचे सांगत ती त्यांच्यासाठी ‘मृत’ असल्याचे जाहीर केले.
कॉलेजच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या या तरुणीने कुटुंबाने ठरवलेल्या लग्नास नकार दिला आणि आपल्या प्रियकरासोबत 12 दिवसांपूर्वी पळून जाऊन विवाह केला होता. तिचे काका सोमनाथ बिस्वास यांनी सांगितले की, “तिने आमचे ऐकले नाही आणि आमची बदनामी केली. ती आता आमच्यासाठी मृत आहे.” कुटुंबाने पूर्ण श्राद्ध विधी पार पाडले, ज्यात पुरुषांनी केशवपन केले आणि मुलीचा फोटो ठेवून पूजा केली. “तिच्या सर्व वैयक्तिक वस्तू आम्ही जाळल्या,” असे तिच्या आईने सांगितले.
रिपोर्टनुसार, ही तरुणी सध्या नदिया जिल्ह्यातच सासरच्या मंडळींसोबत राहते. घरच्यांनी जिवंतपणीच श्राद्ध घातल्याने तिला मानसिक धक्का बसला असून, तिला मानसशास्त्रज्ञांकडून समुपदेशन दिले जात आहे. ती सज्ञान असल्याने पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, त्यामुळे आम्ही स्वतःहून पुढे जाऊ शकत नाही.”
तरुणीचे वडील परदेशात काम करतात, परंतु त्यांनी कुटुंबाच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याचे बिस्वास यांनी सांगितले. तरुणीच्या प्रियकराचा धर्म वेगळा असल्याने कुटुंबाच्या निर्णयावर परिणाम झाला का, याबाबत त्यांनी स्पष्टता दिली नाही.