Ind vs Pak Match : लवकरच सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानने भारतासोबत खेळण्यास नकार दिल्याच्या बातम्यांमुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भारत-पाकिस्तान सामना म्हणजे केवळ खेळ नसून तो एक मोठा व्यवसाय आहे.
पण तुम्हाला माहीत आहे का, की एका भारत-पाकिस्तान सामन्याच्या आयोजनासाठी किती खर्च येतो आणि त्यातून निव्वळ नफा किती होतो? एका सामन्याच्या मॉडेलवरून समजून घेऊया हे आर्थिक गणित.
कमाईचे प्रमुख स्रोत
- तिकीट विक्री (गेट मनी): जर सामना नरेंद्र मोदी स्टेडियमसारख्या मोठ्या मैदानावर असेल, तर सुमारे 1,18,000 तिकिटांची विक्री होते. सरासरी 5,000 रुपयांचे तिकीट धरल्यास केवळ तिकीट विक्रीतून 59 कोटी रुपये जमा होतात.
- कॉर्पोरेट बॉक्स आणि प्रीमियम पॅकेज: उद्योजक आणि दिग्गज लोकांसाठी असलेल्या कॉर्पोरेट बॉक्समधून सुमारे 25 कोटी रुपयांची कमाई होते.
- ब्रॉडकास्टरकडून मिळणारी रक्कम: एका सामन्यातून ब्रॉडकास्टरला 280 ते 350 कोटी रुपये मिळतात, त्यातील आयोजकाचा वाटा सुमारे 25 कोटी रुपये असतो.
- स्थानिक स्पॉन्सरशिप: स्टेडियमच्या आत जाहिराती आणि स्थानिक प्रायोजकांकडून सुमारे 30 कोटी रुपये मिळतात.
- खाद्यपदार्थ आणि वस्तू विक्री: खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीतून 4 कोटी, तर जर्सी किंवा इतर चिन्हांच्या विक्रीतून 3 कोटी रुपये मिळतात.
आयोजनाचा खर्च आणि इतर देयके
- सुरक्षा व्यवस्था: 10,000 हून अधिक पोलीस आणि कमांडोच्या सुरक्षेसाठी साधारण 6 कोटी रुपये खर्च होतात.
- ब्रॉडकास्ट प्रोडक्शन: टीव्ही प्रक्षेपणाच्या तांत्रिक सुविधांसाठी 5 कोटी रुपये खर्च येतो.
- स्टाफ आणि ऑपरेशन्स: व्यावसायिक कर्मचारी आणि मैदानाच्या देखभालीसाठी 2.5 कोटी रुपये लागतात.
- टीम्सचा खर्च: खेळाडूंचा प्रवास, हॉटेल आणि इतर भत्त्यांसाठी 2 कोटी रुपये खर्च होतात.
- सरकारी फी आणि टॅक्स: महापालिका आणि इतर सरकारी शुल्कासाठी 1.5 कोटी, तर जीएसटी (GST) आणि करापोटी सुमारे 5.5 कोटी रुपये जातात.
नफ्याचे गणित
- एकूण अंदाजित उत्पन्न: सुमारे 146.4 कोटी रुपये.
- एकूण अंदाजित खर्च: सुमारे 49.14 कोटी रुपये.
- निव्वळ नफा: खर्च वजा जाता आयोजकांना भारत-पाकिस्तान सामन्यातून सुमारे 97.26 कोटी रुपयांचा नफा मिळतो.
विशेष म्हणजे, टी20 विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत हा नफा 160 कोटी रुपयांपर्यंतही जाऊ शकतो. यातील मोठा वाटा (सुमारे 60 ते 70 टक्के) आयसीसीला (ICC) मिळतो. सर्व खर्च आणि आयसीसीचा वाटा वजा केल्यास, स्थानिक क्रिकेट असोसिएशनला एका सामन्यातून सुमारे 12 ते 14 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. यामुळेच हा सामना रद्द होणे म्हणजे क्रिकेट विश्वाचे मोठे आर्थिक नुकसान मानले जाते.









