Womens Kabaddi World Cup : भारतीय महिला कबड्डी संघाने ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक 2025 जिंकत सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.अंतिम सामन्यात भारताने चायनीज तैपेईचा 35–28 अशा गुणांच्या फरकाने पराभव करून ऐतिहासिक कामगिरी केली.
संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने आपले उत्कृष्ट प्रदर्शन कायम राखले. त्यांनी सर्व गट सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला, जिथे त्यांचा सामना इराणशी झाला. बाद फेरीतही भारताने आपला सनसनाटी फॉर्म कायम ठेवला आणि इराणचा 33–21 गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले.
दुसरीकडे, चायनीज तैपेई संघानेही गट फेरीत अपराजित राहत यजमान बांगलादेशचा उपांत्य फेरीत 25–18 गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अंतिम लढतीत भारतीय संघाने आपला संयम राखत दमदार विजय मिळवला आणि सलग दुसऱ्यांदा विश्वचषक ट्रॉफीवर नाव कोरले.
पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवर वर लिहिले की, “महिलांच्या कबड्डी विश्वचषक 2025 मध्ये विजय मिळवून देशाला अभिमान वाटल्याबद्दल भारतीय महिला कबड्डी संघाचे अभिनंदन! त्यांनी उत्कृष्ट धैर्य, कौशल्य आणि समर्पण दाखवले आहे. त्यांचा हा विजय असंख्य तरुणांना कबड्डी खेळण्यासाठी, मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि उच्च ध्येये ठेवण्यासाठी प्रेरणा देईल.”
महिला कबड्डीच्या प्रगतीचे कौतुक
प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटणचे मुख्य प्रशिक्षक आणि भारताचे माजी कर्णधार अजय ठाकूर यांनीही संघाचे अभिनंदन केले आणि जागतिक स्तरावर महिला कबड्डीने केलेल्या प्रगतीचे कौतुक केले.
“ढाका येथे महिला संघाने विश्वचषकाची ट्रॉफी कायम राखणे, हा भारतासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. अंतिम फेरीपर्यंत त्यांची जबरदस्त कामगिरी आणि त्यानंतर ट्रॉफी जिंकणे, हे गेल्या काही वर्षांत महिला कबड्डीने किती प्रगती केली आहे, हे दर्शवते. बांगलादेशने विश्वचषकाचे आयोजन करणे, हे खेळाच्या जागतिक आकर्षणाची साक्ष आहे आणि मला आशा आहे की ही गती पुढील काळातही कायम राहील,” असे ठाकूर म्हणाले.
या स्पर्धेत एकूण 11 देशांनी सहभाग घेतला होता, जो जागतिक स्तरावर महिला कबड्डीच्या वाढत्या लोकप्रियतेवर प्रकाश टाकतो.
हे देखील वाचा – Congress : बिहारमधील पराभव जिव्हारी लागला! काँग्रेसने 7 नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी









