Rahul Chahar Divorce: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू राहुल चहर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील मोठ्या बदलामुळे चर्चेत आहे. राहुल आणि त्याची पत्नी ईशानी जौहर यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे.
अवघ्या 4 वर्षांच्या आतच हे लग्न मोडल्याने चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. राहुलने स्वतः इंस्टाग्रामवर एक सविस्तर पोस्ट शेअर करत या कठीण प्रवासाबाबत भाष्य केले आहे.
राहुल चहरची पोस्ट: “15 महिने कोर्टाचे फेरे मारले”
आपल्या पोस्टमध्ये राहुलने अत्यंत स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. त्याने लिहिले की, “मी खूपच कमी वयात लग्न केले होते. स्वतःची किंमत आणि जीवनाचा खरा अर्थ समजण्यापूर्वीच मी विवाहबंधनात अडकलो होतो. त्यानंतरचा काळ माझ्यासाठी अत्यंत अनपेक्षित होता. गेल्या 15 महिन्यांपासून मी कोर्टाच्या पायऱ्या चढत होतो, पण या काळात मी संयम आणि सहनशीलता काय असते हे शिकलो.”
घटस्फोटासाठी मोजावी लागली मोठी किंमत
राहुलने पुढे नमूद केले की, त्याच्या आयुष्यातील हे कायदेशीर प्रकरण आता अधिकृतपणे मिटले आहे, परंतु यासाठी त्याला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. “माझ्या आयुष्यातील हा अध्याय आता संपला आहे. काही नाती ही आयुष्यभर टिकण्यासाठी नसतात, तर ती आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आणि बदलण्यासाठी येतात. मी आता कोणत्याही रागाशिवाय किंवा पश्चात्तापाशिवाय नवीन सुरुवात करण्यास सज्ज आहे,” असेही त्याने म्हटले आहे.
2022 मध्ये झाले होते लग्न
राहुल चहर आणि ईशानी जौहर यांचा विवाह 9 मार्च 2022 रोजी पार पडला होता. लग्नापूर्वी ते अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. मात्र, लग्नानंतर काही काळातच त्यांच्यात मतभेद सुरू झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून राहुल मैदानावर संघर्ष करत असतानाच त्याच्या खाजगी आयुष्यातही मोठी उलथापालथ सुरू होती. अखेर या कायदेशीर प्रक्रियेनंतर दोघांचे रस्ते कायमचे वेगळे झाले आहेत.










