T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट विश्वात मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. सुरक्षा कारणास्तव भारतात येण्यास नकार देणाऱ्या बांगलादेशला आयसीसीने स्पर्धेतून बाहेर काढून त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला.
या निर्णयावर इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेन यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून आयसीसीच्या पक्षपाती धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नासेर हुसेन यांचा आयसीसीला थेट सवाल
एका प्रसिद्ध पॉडकास्टमध्ये बोलताना नासेर हुसेन म्हणाले की, “जर भारताने स्पर्धेच्या एक महिना आधी सांगितले असते की त्यांचे सरकार सुरक्षा कारणांमुळे दुसऱ्या देशात खेळण्यास परवानगी देत नाहीये, तर आयसीसीने त्यांनाही स्पर्धेतून बाहेर काढण्याची हिंमत दाखवली असती का? आयसीसीने सर्व देशांसाठी एकच नियम लावला पाहिजे.”
भारताकडे पैसा आणि सत्ता आहे, परंतु त्यासोबत जबाबदारीही येते, असे सांगत त्यांनी आयसीसीला सर्व संघांना समान वागणूक देण्याचा सल्ला दिला.
वाद नेमका काय आहे?
१. मुस्तफिजुर रहमानवर बंदी: आयपीएल दरम्यान बीसीसीआयच्या सूचनेनुसार बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले होते. यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यात तणाव वाढला.
२. सुरक्षेचा मुद्दा: बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली भूमिका स्पष्ट केली होती, ज्याला प्रतिसाद म्हणून बांगलादेशने भारतात येऊन खेळण्यास नकार दिला.
३. पाकिस्तानचा पाठिंबा: बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.
नासेर हुसेन यांना सोशल मीडियावर टोला
हुसेन यांच्या या विधानानंतर सोशल मीडिया युजर्सनी २००३ च्या विश्वचषकाची आठवण करून दिली. त्यावेळी इंग्लंडने झिम्बाब्वेमधील राजकीय परिस्थितीचे कारण देत सामन्यावर बहिष्कार टाकला होता. आयसीसीने बांगलादेशवर घेतलेली ही कडक भूमिका क्रिकेट जगतात चर्चेचा विषय ठरली आहे. आता १५ फेब्रुवारीला होणाऱ्या भारत-पाक सामन्यावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









