IND vs NZ Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने भारतीय प्रेक्षकांना शांत करण्याचे विधान केले होते, ज्यावर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने अत्यंत मिश्किल पण सडेतोड उत्तर दिले आहे.
“सगळे तेच बोलतायत, काहीतरी नवीन सांगा”
पत्रकार परिषदेत जेव्हा सँटनरच्या विधानाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा सूर्यकुमार हसून म्हणाला, “सगळेच आता तीच ओळ चिकटवत आहेत. काहीतरी नवीन बोला!” सूर्याचा हा टोला २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमधील पॅट कमिन्सच्या विधानाशी जोडला जात आहे, ज्याने भारतीय प्रेक्षकांना शांत करण्याचे आव्हान दिले होते. सूर्याच्या मते, आता अशा विधानांचा अंदाज बांधणे सोपे झाले आहे.
दडपण आहे, पण उत्साहही मोठा!
भारतीय संघाचे नेतृत्व करताना दडपण असल्याचे सूर्याने मान्य केले. तो म्हणाला, “कर्णधार म्हणून दडपण असणारच, हे मी नाकारू शकत नाही. विशेषतः भारतात विश्वचषकाची फायनल खेळताना उत्साह आणि दडपण दोन्ही वाढते. पण आमच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण अतिशय सकारात्मक आहे आणि सर्व खेळाडू या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेण्यासाठी सज्ज आहेत.”
न्यूझीलंडची रणनीती काय?
दुसरीकडे, मिचेल सँटनरने स्पष्ट केले की त्यांचा संघ दबावाखाली न येता आपल्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करेल. सँटनर म्हणाला, “आमचे ध्येय प्रेक्षकांना शांत करणे हेच आहे. टी-२० क्रिकेटमध्ये परिस्थिती कधीही बदलू शकते. आम्ही फेव्हरेट नसलो तरी आम्हाला त्याचा फरक पडत नाही. १ लाख प्रेक्षकांसमोर खेळताना भारतावर जास्त दडपण असेल आणि काही भारतीयांची मने तोडून चषक उंचावण्यास मला नक्कीच आवडेल.”
उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा ९ गडी राखून पराभव करणारा न्यूझीलंड संघ आता भारतासमोर मोठे आव्हान उभे करण्यासाठी सज्ज आहे. तर, गतविजेता भारत आपल्या घरच्या मैदानावर जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल.









