Yuvraj Singh Cancer Battle: भारतीय क्रिकेटचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंगने आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि हृदयद्रावक काळाबद्दल पुन्हा एकदा मौन सोडले आहे. २०११ चा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या युवराजला त्या काळात कॅन्सरने ग्रासले होते, मात्र देशासाठी खेळण्याच्या जिद्दीने त्याने आपल्या आजाराकडे दुर्लक्ष केले होते. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने त्या भयाण अनुभवाचा खुलासा केला आहे.
मैदानावर खेळतानाच आजाराची चाहूल
युवराजने सांगितले की, विश्वचषक स्पर्धेदरम्यान त्याला प्रचंड थकवा, मळमळ आणि अस्वस्थता जाणवत होती. खेळाडू म्हणून आपण कधी आजारी पडू शकतो, असा विचारही त्याच्या मनात आला नव्हता. भारतासाठी खेळण्याचे दडपण आणि ओढ इतकी होती की त्याने त्या त्रासाकडे दुर्लक्ष केले. मात्र, स्पर्धेनंतर त्याची तब्येत वेगाने बिघडली आणि चाचण्यांमध्ये त्याच्या छातीत दुर्मिळ प्रकारचा ट्यूमर असल्याचे समोर आले.
डॉक्टरांचा तो धक्कादायक इशारा
युवराजने मायकल वॉनसोबतच्या संवादात एका घटनेचा उल्लेख केला, जेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत्यूचा इशारा दिला होता. डॉक्टर म्हणाले होते, “तुझा ट्यूमर हृदय आणि फुफ्फुसांच्या मधल्या नलिकेवर आहे. तू आता क्रिकेट खेळलास तर तुला हार्ट अटॅक येईल. जर तू त्वरित केमोथेरपी सुरू केली नाहीस, तर तुझ्याकडे जगण्यासाठी फक्त ३ ते ६ महिने उरले आहेत.”
शून्यातून उभं राहण्याची जिद्द
डॉक्टरांच्या या शब्दांनी युवराजला जमिनीवर आणले. २०११-१२ दरम्यान त्याने अमेरिकेत उपचार घेतले. हा काळ केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही थकवणारा होता. आपल्याला पुन्हा कधी क्रिकेट खेळता येईल की नाही, हे मान्य करायलाच त्याला वर्षभर लागले. कोणाचाही विश्वास नसताना केवळ स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने उपचार पूर्ण केले आणि पुन्हा मैदानात पाय ठेवला.
स्वतः कॅन्सर फाऊंडेशन चालवणारा युवराज सुरुवातीला स्वतःच्या आजाराबाबत गाफील राहिला होता, ही खंतही त्याने व्यक्त केली. मात्र, मृत्यूच्या दारातून परत येऊन त्याने केलेली कामगिरी ही क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रेरणादायी ‘कमबॅक स्टोरी’ मानली जाते.











