Cancer Symptoms: जगभरात पसरत असलेल्या दुर्धर आजारांच्या यादीत आता भारताचे नाव आघाडीवर येत असून ही परिस्थिती अत्यंत भीतीदायक आहे. ताज्या वैद्यकीय अहवालानुसार, कॅन्सरग्रस्तांच्या जागतिक आकडेवारीत भारत आता पहिल्या तीन देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे.
प्रतिवर्षी १५ लाखांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत असल्याने आरोग्य यंत्रणांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या आजाराने आता तरुणांनाही आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे.
गंभीर लक्षणे ओळखण्यात का होतोय विलंब?
कॅन्सर हा असा आजार आहे जो शरीरात अतिशय संथ गतीने आणि गुपचूप वाढत असतो. सुरुवातीच्या काळात याची लक्षणे इतकी सामान्य असतात की, लोक त्यांना दैनंदिन थकवा किंवा साधे आजार समजून दुर्लक्ष करतात. अनेकदा पोट दुखणे किंवा सतत जाणवणारा अशक्तपणा या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे जेव्हा हा आजार निदान होतो, तेव्हा तो तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात पोहोचलेला असतो.
‘या’ साध्या बदलांकडे लक्ष द्या
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरातील काही किरकोळ बदल हे मोठ्या संकटाचे संकेत असू शकतात:
- विनाकारण वजन घटणे: जर तुमच्या वजनात अचानक घट होत असेल आणि सतत सुस्ती जाणवत असेल, तर ते केवळ कामाच्या तणावाचे लक्षण असू शकत नाही. पचनक्रियेत होणारे सततचे बदल ही धोक्याची पहिली पायरी असू शकते.
- न दुखणाऱ्या गाठी: शरीरावर कुठेही गाठ आली असेल आणि तिला अजिबात वेदना होत नसतील, तर ती अधिक चिंताजनक बाब आहे. स्तन, मान किंवा इतर अवयवांवरील गाठींची तपासणी करणे अनिवार्य आहे, कारण वेदना नसणे म्हणजे धोका नाही असा होत नाही.
- वारंवार उद्भवणारा त्रास: बरा होऊन पुन्हा पुन्हा होणारा खोकला, शौचावाटे रक्त पडणे किंवा आवाजात अचानक झालेला बदल या गोष्टींकडे दीर्घकाळ दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते.
प्रतिबंध हाच उत्तम उपाय
स्तन आणि पोटाचा कॅन्सर यांसारख्या आजारांची सुरुवातीला कोणतीही मोठी लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे ४० वर्षांवरील व्यक्तींनी आणि धावपळीच्या जीवनशैलीत जगणाऱ्या तरुणांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी (Medical Check-up) करून घेणे आवश्यक आहे. कोणताही त्रास २ ते ३ आठवड्यांहून अधिक काळ टिकत असेल, तर घरगुती उपाय करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरते.










