E20 Petrol India: देशातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि इंधन आयातीवरील खर्च वाचवण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्वच्छ इंधन’ योजनेला गती दिली आहे. १ एप्रिल २०२६ पासून भारतभरातील पेट्रोल पंपांवर विकले जाणारे पेट्रोल अधिक प्रमाणात इथेनॉल मिश्रित असेल.
नव्या नियमांनुसार, तेल कंपन्यांना आता पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळणे आणि विशिष्ट दर्जा राखणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तेल कंपन्यांना सरकारचे आदेश
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने १७ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तेल विपणन कंपन्यांना ‘E20’ पेट्रोलचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या इंधनाचा दर्जा भारतीय मानक ब्युरोच्या नियमांनुसार असणे आवश्यक आहे.
इंजिनची कार्यक्षमता आणि गुणवत्ता
नव्या मानकांनुसार, या पेट्रोलचा रिसर्च ऑक्टेन नंबर किमान ९५ असणे गरजेचे आहे. ऑक्टेन नंबर हा इंधनाच्या गुणवत्तेचे मोजमाप असून, यामुळे इंजिनमधील ‘नॉकिंग’ची समस्या कमी होते आणि वाहनाची कार्यक्षमता सुधारते. याचाच अर्थ असा की, आता देशभरातील पेट्रोल पंपांवर हळूहळू उच्च गुणवत्तेचे आणि अधिक इथेनॉल असलेले इंधन उपलब्ध होईल.
काही क्षेत्रांसाठी सवलत
केंद्र सरकारने या नियमाच्या अंमलबजावणीमध्ये थोडी लवचिकताही ठेवली आहे. काही विशेष परिस्थितींमध्ये किंवा विशिष्ट भौगोलिक क्षेत्रांसाठी, तेल कंपन्यांना मर्यादित कालावधीसाठी इथेनॉल मिश्रणाच्या अटीतून तात्पुरती सूट दिली जाऊ शकते. मात्र, मुख्य उद्देश हा संपूर्ण देशाला १ एप्रिलपासून E20 इंधनाकडे वळवण्याचा आहे.
या निर्णयामुळे शेती क्षेत्रालाही चालना मिळेल, कारण इथेनॉलची निर्मिती प्रामुख्याने ऊस आणि इतर धान्यांपासून केली जाते. तसेच, यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मोठी मदत होणार आहे.











