Gen Z Social Media Detox: एकेकाळी दिवसभर स्मार्टफोनमध्ये मग्न असणारी तरुण पिढी आता सोशल मीडियापासून लांब पळताना दिसत आहे. केवळ करमणुकीसाठी सुरू झालेली ही माध्यमे आता जाहिराती, खोट्या जीवनशैलीची तुलना आणि माहितीचा अतिरेक यामुळे थकवणारी ठरत आहेत.
परिणामी, अनेक तरुण आपले सोशल मीडिया अकाऊंट्स कायमचे बंद करून वास्तविक जगात वेळ घालवण्याला प्राधान्य देत आहेत. “पूर्वी लोक जगाचा ताण विसरण्यासाठी फोन वापरायचे, आता फोनचा ताण विसरण्यासाठी लोक जगाकडे वळत आहेत,” असा सूर सध्या तरुणाईमध्ये उमटत आहे.
आकडेवारी काय सांगते?
नुकत्याच झालेल्या एका जागतिक पाहणीनुसार, जवळपास 33% तरुण यूजर्सने गेल्या 12 महिन्यांत किमान एक सोशल मीडिया ॲप आपल्या फोनमधून काढून टाकले आहे. 2022 मध्ये सोशल मीडियाच्या वापराने उच्चांक गाठला होता, मात्र त्यानंतर यामध्ये सातत्याने घट होत आहे. विशेषतः 16 ते 25 वयोगटातील तरुणांमध्ये हा बदल अधिक ठळकपणे जाणवत असून, सोशल मीडियावरील वेळ दिवसाला सरासरी 10% ने कमी झाला आहे.
तरुणाई सोशल मीडिया का सोडतेय?
- मानसिक आरोग्यावर परिणाम: सततच्या माहितीच्या ओघामुळे मेंदूला विश्रांती मिळत नाही. सोशल मीडियामुळे ‘आपण आयुष्यात मागे आहोत’ अशी भावना निर्माण होत असल्याने अनेकजण यापासून दूर जात आहेत.
- जाहिरातींचा अतिरेक: सध्याच्या फीडमध्ये वैयक्तिक पोस्टपेक्षा ब्रँड्सच्या जाहिराती आणि प्रायोजित व्हिडिओंचा भरणा अधिक असतो, ज्यामुळे युजर्सचा रस कमी होत आहे.
- नकारात्मकता आणि द्वेष: इंटरनेटवर वाढलेली टीका आणि गटबाजी यामुळे तरुण या प्लॅटफॉर्मवर वेळ घालवणे टाळत आहेत.
- प्रायव्हसी आणि नियंत्रण: स्वतःच्या आयुष्यावर अधिक नियंत्रण मिळवण्यासाठी आणि स्वतःची ओळख सोशल मीडियाच्या चौकटीबाहेर शोधण्यासाठी तरुण ऑफलाईन होत आहेत.
‘अॅनालॉग’ आयुष्याची ओढ
सोशल मीडिया सोडल्यानंतर तरुण आता जुन्या पद्धतीचे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश आहे:
- स्मार्टफोन सोडून केवळ कॉलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या साध्या ‘ब्रिक फोन’चा वापर करणे.
- गाणी ऐकण्यासाठी डिजिटल ॲप्सऐवजी व्हिनिल रेकॉर्ड्स आणि जुन्या कॅसेट्स खरेदी करणे.
- प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे, वाचन करणे किंवा विणकामासारखे हस्तकलेचे छंद जोपासणे.
- आभासी जगातील लाईक्सपेक्षा प्रत्यक्ष अनुभवांना अधिक महत्त्व देणे.
ऑफलाईन असणे आता ‘कूल’!
एकेकाळी जास्त फॉलोअर्स असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाई, मात्र आता चित्र पूर्णपणे बदलत आहे. ज्यांचे सोशल मीडियावर अस्तित्व नाही, अशा लोकांकडे आता एक वेगळेपण किंवा ‘कूल फॅक्टर’ म्हणून पाहिले जात आहे. स्वतःच्या आनंदासाठी कुणाच्याही मान्यतेची (व्हॅलिडेशन) गरज नसलेली ही पिढी आता 80 आणि 90 च्या दशकातील साधेपणाकडे परतताना दिसत आहे.










