Maharashtra Revenue Department land scam 2026: राज्याच्या महसूल विभागात ‘शुद्धलेखन दुरुस्ती’च्या नावाखाली हजारो जमिनींची अफरातफर झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत या महाघोटाळ्याची कबुली दिली असून, दोषींवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.
महसूल संहितेतील एका विशिष्ट कलमाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांनी दुसऱ्यांच्या जमिनी भलत्याच व्यक्तींच्या नावावर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
Maharashtra Land Scam: कलम १५५ चा असा झाला गैरवापर
महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील (MLRC) कलम १५५ नुसार, तहसीलदारांना जमिनीच्या उताऱ्यावरील नावातील किंवा आडनावातील शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करण्याचा अधिकार आहे. मात्र, या अधिकाराचा दुरुपयोग करून एका व्यक्तीची जमीन दुसऱ्याच्या नावावर चढवण्याचे प्रकार सर्रास घडले आहेत.
- पुणे विभागातील धक्कादायक आकडेवारी: एकट्या पुणे विभागात ३६,००० संशयास्पद प्रकरणे समोर आली आहेत.
- प्राथमिक तपास: यातील ३,००० प्रकरणांची चौकशी पूर्ण झाली असून, सुमारे ५०० प्रकरणांमध्ये गंभीर दोष आणि अनियमितता आढळली आहे.
Maharashtra Land Scam: विभागीय आयुक्तांची समिती करणार चौकशी
नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समितीने या घोटाळ्याचा अहवाल सरकारला सादर केला आहे. सध्या केवळ पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रकरणांचा तपास झाला असला, तरी पुढील ३ महिन्यांत नाशिक, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागातील अशा प्रकरणांची चौकशी केली जाणार आहे. संपूर्ण राज्यात सुमारे १ ते १.५ लाख अशी बोगस प्रकरणे निघण्याची शक्यता बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.
Maharashtra Land Scam: दोषी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
गेल्या ५ ते १० वर्षांच्या काळात हा प्रकार मोठ्या प्रमाणावर घडला आहे. या भ्रष्टाचारात सामील असलेल्या महसूल अधिकाऱ्यांवर शासन निर्णय घेऊन कठोर कारवाई केली जाईल. तसेच, ज्यांच्या जमिनींचे रेकॉर्ड खराब झाले आहेत, ते दुरुस्त करण्यासाठी एका जिल्हाधिकाऱ्याला विशेष अधिकार दिले जाणार आहेत. या संपूर्ण चौकशीचा ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ (ATR) लवकरच सभागृहात मांडला जाईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा – Russian Oil Rerouted: इंधन संकट टळणार! चीनला जाणारी रशियन तेलाची जहाजे भारताकडे वळली










