Ravindra Kaushik Biography: बॉलिवूडने धुरंधर, पठाण आणि टायगर सारख्या सिनेमांतून हेरांचे जग रुपेरी पडद्यावर आणले. मात्र, या काल्पनिक कथांच्या अनेक वर्षे आधी भारतात एक अशी व्यक्ती होऊन गेली, ज्यांचे आयुष्य कोणत्याही सिनेमापेक्षा कमी नव्हते.
रवींद्र कौशिक, ज्यांना भारताचे ‘ब्लॅक टायगर’ म्हणून ओळखले जाते, हे भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’चे (R&AW) आजवरचे सर्वात धाडसी एजंट मानले जातात.
कोण होते रवींद्र कौशिक?
रवींद्र कौशिक यांचा जन्म 11 एप्रिल 1952 रोजी राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे झाला. भारत-पाकिस्तान सीमेजवळ राहिल्यामुळे त्यांना पंजाबी आणि स्थानिक बोलीभाषा अवगत होत्या. कॉलेजमध्ये असताना त्यांनी नाटकात काम करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. 1973 मध्ये लखनौ येथील एका स्पर्धेत त्यांनी सादर केलेल्या एका सैनिकाच्या भूमिकेने ‘रॉ’च्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर त्यांना दिल्लीत कठोर प्रशिक्षण देण्यात आले, जिथे त्यांनी इस्लाम धर्म, पाकिस्तानी उर्दू आणि तिथल्या भूगोलाचा सखोल अभ्यास केला.
मेजर पदापर्यंत मारली मजल
वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी, 1975 मध्ये रवींद्र कौशिक ‘नबी अहमद शाकीर’ या नावाने पाकिस्तानात दाखल झाले. तिथे त्यांनी चक्क कराची विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली आणि पाकिस्तान लष्करात भरती झाले. आपल्या हुशारीच्या जोरावर ते मेजर पदापर्यंत पोहोचले. इतकेच नाही तर त्यांनी अमानत नावाच्या पाकिस्तानी तरुणीशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगाही झाला.
भारतासाठी महत्त्वाची कामगिरी
1979 ते 1983 या काळात कौशिक यांनी भारताला अत्यंत गोपनीय माहिती पुरवली. यामध्ये पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली आणि पाकिस्तानचा कहूटा येथील अणू प्रकल्प यांसारख्या संवेदनशील माहितीचा समावेश होता. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना ‘ब्लॅक टायगर’ ही पदवी दिली होती.
पकडले गेले आणि शेवटचा प्रवास
1983 मध्ये ‘रॉ’ने त्यांच्या मदतीसाठी इनायत मसीह नावाच्या एका कनिष्ठ गुप्तहेराला पाठवले. मात्र, मसीहला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने (ISI) पकडले. चौकशी दरम्यान मसीहने कौशिक यांची माहिती उघड केली, ज्यामुळे सप्टेंबर 1983 मध्ये मुलतान येथील एका पार्कमधून रवींद्र कौशिक यांना अटक करण्यात आली.
त्यांना पाकिस्तानच्या विविध तुरुंगात ठेवण्यात आले आणि छळ करण्यात आला. 1985 मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, जिचे नंतर जन्मठेपेत रूपांतर झाले. तब्बल 16 वर्षे तुरुंगात काढल्यानंतर, 21 नोव्हेंबर 2001 रोजी मियांवाली सेंट्रल जेलमध्ये क्षयरोग आणि हृदयविकाराने या महान सुपुत्राचे निधन झाले.










