TRAI New Recharge Rules: जर तुम्ही दरमहा मोबाईल रिचार्ज करत असाल, तर तुमच्यासाठी केंद्र सरकारकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) अशा ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे जे फोनचा वापर प्रामुख्याने फक्त कॉलिंगसाठी करतात.
‘ट्राय’ने एक नवीन कंसल्टेशन पेपर प्रसिद्ध केले असून टेलिकॉम कंपन्यांना केवळ व्हॉइस कॉलिंगसाठी विशेष प्लॅन्स उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जाण्याची शक्यता आहे.
आता सक्तीने डेटा घेण्याची गरज नाही
सध्या मोबाईल यूजर्सला रिचार्ज करताना डेटा पॅक घेणे जवळजवळ अनिवार्य असते, मग त्यांना इंटरनेटची गरज असो वा नसो. नवीन प्रस्तावानुसार, कंपन्यांना आता 1 महिना, 3 महिने, 6 महिने आणि वार्षिक वैधतेचे केवळ ‘व्हॉइस-ओनली’ पॅक द्यावे लागतील. हे प्लॅन्स डेटा प्लॅन्सच्या तुलनेत बरेच स्वस्त असतील. याचा सर्वाधिक फायदा ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना होईल, जे इंटरनेटचा वापर कमी प्रमाणात करतात.
२८ एप्रिलपर्यंत मागवल्या सूचना
मिळालेल्या माहितीनुसार, ‘ट्राय’ने या प्रस्तावावर सर्व संबंधित घटकांकडून 28 एप्रिलपर्यंत मते आणि सूचना मागवल्या आहेत. या प्रक्रियेनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. या निर्णयामुळे टेलिकॉम क्षेत्रात स्पर्धा वाढेल आणि ग्राहकांना अधिक स्वस्त पर्याय उपलब्ध होतील.
सध्याचे फॅमिली प्लॅन्सची स्थिती
एकीकडे स्वस्त कॉलिंगची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे फॅमिली प्लॅन्सही सध्या लोकप्रिय आहेत:
- Jio: जिओचा फॅमिली प्लॅन 449 रुपयांपासून सुरू होतो. यामध्ये मुख्य सिमवर 75GB डेटा मिळतो. अतिरिक्त 150 रुपयांमध्ये तुम्ही नवीन सिम जोडू शकता. साधारण 899 रुपयांत 4 जणांचे कुटुंब हा प्लॅन वापरू शकते, ज्याचा खर्च प्रति व्यक्ती केवळ 225 रुपये येतो.
- Airtel: एअरटेल 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2 कनेक्शन्स देते. यामध्ये अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगसह काही ओटीटी सबस्क्रिप्शनही मिळतात. मोठ्या कुटुंबांसाठी 1199 आणि 1399 रुपयांचे प्लॅन्स उपलब्ध आहेत, ज्यात 4 कनेक्शन्स आणि 240GB पर्यंत डेटा शेअरिंगची सोय असते.
‘ट्राय’च्या या नवीन निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावरचा ताण नक्कीच कमी होणार आहे.










