आगामी महापालिका निवडणुकीत २०१७ चा फॉर्म्युला वापरणार

मुंबई-मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागा, असे निर्देश महायुतीच्या नेत्यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती स्वबळावर न लढता एकत्र लढणार आहे. मात्र, सत्तेत आल्यानंतर २०१७ चा फॉर्म्युला वापरला जाईल, अशी माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली. शिवसेनेचे (शिंदे गट) नगरसेवक अधिक निवडून आले तर मुंबईचे महापौर पद शिवसेनेच्या (शिंदे गट) ताब्यात असेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
सर्वोच्च न्यायालयाने ४ महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागला असून या निवडणुका ऑक्टोबर महिन्याच्या पंधरवड्यात होतील, असे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. भाजपाकडे त्यावेळी मुख्यमंत्री पद होते. तर शिवसेनेकडे (उबाठा) मुंबई महापालिकेत महापौर पद होते. दरम्यान, भाजपाला स्थायी समिती तर शिवसेनेकडे (शिंदे गट) महापौरपद ठेवले जाणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच मुंबई महापालिका निवडणूक होत आहे. मुंबईत पूर्वीपासूनच शिवसेनेचे वर्चस्व आहे. भाजपाने १५० जागांवर दावा केला तरी तेवढ्या जागा सद्यस्थितीत देणे योग्य ठरणार नाही. तीनही घटक पक्षांकडून जागा वाटपात सामंजस्य भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय सुरू असल्याचे गोगावले म्हणाले.