मी माझे शब्द मागे घेतो! अबू आझमींनी माफी मागितली

मुंबई – सोलापूरमध्ये मी केलेल्या एका वक्तव्यामुळे पसरलेल्या गैरसमजुतीबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. माझे वक्तव्य तोडून मोडून आणि दुर्भावनापूर्ण पद्धतीने सादर केले आहे. माझ्या वक्तव्यामुळे वारकरी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतो आणि सर्वांची माफी मागतो. माझा हेतू कधीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता, असे स्पष्टीकरण समाजवादी पक्षाचेआमदार अबू आझमी यांनी दिले. अबू आझमी यांनी पंढरपूर वारी पालखीबाबत केलेल्या विधानावरून राजकारण तापले होते. त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज त्यांच्या वक्तव्याबाबत माफी मागितली.
आझमी यांनी म्हटले की, मी एक समर्पित समाजवादी आहे आणि नेहमीच प्रत्येक धर्म, संस्कृती, सूफी संत आणि त्यांच्या परंपरांचा आदर करतो. वारी परंपरेचे पालन करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. ही परंपरा महाराष्ट्राच्या आंतरधर्मीय, समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसाचा अभिमानास्पद भाग आहे, ज्याचा मी
वैयक्तिकरित्या आदर करतो. मी वारी पालखीचा उल्लेख फक्त मुस्लीम समुदायाविरुद्ध आणि त्यांच्या हक्कांविरुद्ध भेदभावाच्या संदर्भात केला होता. ही कोणत्याही प्रकारची तुलना नव्हती. माझा हेतू आणि माझी मागणी कोणत्याही प्रकारे अयोग्य नव्हती. माझा एकमेव उद्देश सरकारचे लक्ष वेधून घेणे होता. सरकारच्या दुटप्पीपणामुळे अल्पसंख्याक समुदायाच्या मनात अशी भावना निर्माण होऊ नये की, या देशात त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत. तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः म्हणतात ‌‘सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास. आम्ही उपेक्षित समाजाच्या हक्कांसाठी, आदरासाठी आणि समानतेसाठी जोरदार लढत राहू, परंतु देशाच्या एकतेला कधीही बाधा पोहोचू देणार नाही.