मुंबई – मागील १५ दिवसांत मुंबईसह राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याचे दिसून आले. मात्र, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सातही धरण क्षेत्रांकडे पावसाने पाठ फिरवल्याने मुंबईचा पाणीसाठा आटत चालला आहे. सध्या या
तलावांमध्ये १ लाख ९१ हजार ९४२ दशलक्ष लिटर म्हणजे केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काळात दमदार पाऊस पडला नाही तर मुंबईवर पाणीकपातीचे संकट येऊ शकते.
मुंबई शहर आणि उपनगराला मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज ३ हजार ९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत साधारणपणे १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. ऑक्टोबरमध्ये सातही तलावांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणीसाठा जाहीर केला जातो. काल २ जून रोजी हा पाणीसाठा अप्पर वैतरणा १६,०२०, मोडकसागर ४०,७३९, तानसा १८,२०४, मध्य वैतरणा २७,३२७, भातसा ७८,१८०, विहार ८,९४४ आणि तुळशी २,५२७ दशलक्ष लिटर इतका होता. मात्र राज्य सरकारने मुंबईला २ लाख ३० हजार ५०० दशलक्ष लिटर राखीव साठा तत्त्वतः उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ज्यावेळी पाणीसाठा अगदीच कमी होईल त्यावेळी राज्य सरकारच्या भातसा आणि अप्पर वैतरणा तलावांमधून हा साठा घेण्यात येईल.
