शरद पवारांची ऑपरेशन सिंदूरबाबत दुटप्पी भूमिका


पुणे- शरद पवार गटाच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त ‌‘सरकारच्या असत्याचा बुरखा फाड‌’ ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’वर थेट टीका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांनी या ऑपरेशनचे उघडपणे कौतुक केले होते. इतकेच नव्हे मोदी सरकारने या मोहिमेची माहिती परदेशात जाऊन सांगण्यासाठी जी प्रतिनिधी मंडळे पाठवली त्यात सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात एक पथक गेले होते .
पुस्तिकेतून ऑपरेशन सिंदूर संदर्भात साशंकता व्यक्त करताना, भाजपावर तीव्र टीका करण्यात आली आहे. यामध्ये जयंत पाटील यांचा सत्य जनतेला समजावून सांगा आणि वेंकटेश केसरी यांचा सिंदूर मार्केटिंग भाजपाला किती काळ तारेल?‌’ या लेखांमधून भाजपावर आरोप करण्यात आले आहेत. ऑपरेशनच्या माध्यमातून भाजपा राजकीय फायद्यासाठी प्रचार करत असल्याचा आरोप या लेखांमध्ये करण्यात आला आहे. पुस्तिकेत पहेलगामचे खरे मारेकरी कोण? असा थेट प्रश्न उपस्थित करून ऑपरेशनविषयी गंभीर शंका व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताचे विमान पाडले हे सत्य आहे, हा देखील उल्लेख केला आहे. एवढेच नव्हे, तर बीड हत्याकांड, स्वारगेट बलात्कार प्रकरणांचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबतच अजित पवार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व्यंगचित्रे देखील या पुस्तिकेत आहेत. यामुळे शरद पवार गटाची भूमिका नेमकी काय आहे? याबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.