सांगली- कृषी विभागाच्या योजनांसाठी राज्यातील शेतकर्यांना ऑनलाइन अर्ज करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकरी महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकतात, तसेच त्यांना शेतकरी ओळख क्रमांक असणे आवश्यक आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातर्फे प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
राज्यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनाअंतर्गत शेतकरी वर्गाला शेतीपयोगी यंत्रे व औजारे तसेच इतर आवश्यक बाबींचा अनुदान तत्वावर लाभ दिला जातो. अनुदान हे केंद्र व राज्य सरकार दोहोंच्या हिस्सेदारीने दिले जाते. लाभ देण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य कृषी विभाग यांचे अधिकृत पोर्टल महाडीबीटी याद्वारे ऑनलाईन पद्धतीने केली जाते. योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांनी त्यांना आवश्यक शेतीपयोगी यंत्र व अवजारे व इतर आवश्यक बाबीकरिता पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्ज केल्यानंतर भविष्यात होणाऱ्या सोडतीमध्ये ज्या अर्जदारांचे नाव येईल त्यात ते शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतात. चालू खरीप हंगाम २०२५- २०२६ पासून अर्ज व सोडत प्रक्रियेबाबत वरिष्ठ स्तरावरून काही बदल केले गेले आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर निवड झालेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. यामध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात आलेले आहेत. ही यादी डीबीटी पोर्टल, कृषि विभागाचे संकेतस्थळ तसेच कृषि विभागाच्या क्षेत्रिय अधिकारी यांच्या लॉगईन वर सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे.
