Raj thackeray – मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray)यांनी मुंबईतील सर्व 53 उमेदवारांना आज शिवतीर्थावर बोलावून महत्त्वाचा कानमंत्र दिला. निवडणुकीत पैशांच्या आमिषाला बळी पडू नका, मुंबई वाचवण्यासाठी एकजुटीने लढा, असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला. या भेटीवेळी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सर्व उमेदवारांचे औक्षण केले.
राज ठाकरे म्हणाले की, उमेदवारांना पैशांच्या ऑफर येतील, मात्र कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, पैसे दिले तरीही झुकू नका.आपल्याला मुंबई वाचवायची आहे. मुंबई मराठी माणसांची आहे आणि ही आपली शेवटची संधी आहे. सर्व उमेदवारांनी एकजुटीने आणि प्रामाणिकपणे निवडणूक लढवायची आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथवर किमान दहा कार्यकर्ते उभे ठेवा, जेणेकरून बोगस मतदान रोखता येईल. सर्वांनी सतर्क राहा. जर एखादा बोगस मतदार आढळला, तर त्याला तिथेच फटकावून काढा.
शेवटी स्वतःचा अनुभव सांगताना राज ठाकरे म्हणाले की, मलाही खूप ऑफर आल्या होत्या, पण मी सगळ्यांना पळवून लावले. संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. त्यांच्यात साडेचार तास चर्चा झाली. या बैठकीला आ. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे तसेच दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिकांच्या निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. प्रचाराची दिशा, संयुक्त सभा, रोड शो व रॅलींचे नियोजन, तसेच बंडखोर उमेदवारांना शांत करण्याची रणनीती यासोबतच जाहीरनाम्यात कोणते मुद्दे समाविष्ट करायचे यावरही विचारविनिमय झाल्याची माहिती आहे.
पुढील 11 दिवसांत होणार्या प्रचार सभांचे नियोजन, 13 तारखेला होणार्या सांगता सभेचे ठिकाण आणि आदित्य व अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणार्या रोड शो व बाईक रॅलीबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे कळते. मनसे-उबाठा जाहीरनामा तयार करण्याची जबाबदारी मनसेकडून मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे, तर ठाकरे सेनेकडून सचिव साईनाथ दुर्गे यांच्याकडे सोपवली आहे.
हे देखील वाचा –
पुण्यातील राजकीय ड्रामा; एबी फॉर्म गिळून दिला प्रतिस्पर्ध्याला धक्का
निवडणुकीतून माघार, पण संघर्ष थांबणार नाही; भाजपाच्या अधिकृत उमेदवार पूजा मोरेंची निवडणुकीतून माघार














