Aaditya Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या नावावर आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे शिक्कामोर्तब झाले आहे. अर्ज भरण्याच्या प्रसंगी शिवसेनेचे (ठाकरे गट) भास्कर जाधव, काँग्रेसचे सतेज पाटील आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र, या महत्त्वपूर्ण क्षणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी आदित्य ठाकरे आग्रही असल्याने ते नाराज असल्याची कुजबूज सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर, आज आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.
‘नाराजी नव्हे, तर पक्षहिताची भूमिका’
आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करतानाच आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, “शरद पवार यांचे राजकारणातील स्थान अढळ आहे आणि त्यांचे माझ्या आजोबांपासूनचे जे कौटुंबिक ऋणानुबंध आहेत, त्याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, मी जी भूमिका मांडत होतो, ती पूर्णतः पक्षहितासाठी होती. यामध्ये कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. राज्यसभेचा हा ‘टर्न’ किंवा ही संधी यावेळेस शिवसेनेला मिळावी, असे माझे स्पष्ट मत होते. जर ही संधी आता हुकली, तर संख्याबळाची गणिते पाहता शिवसेनेला २०२९ पर्यंत पुन्हा राज्यसभेची संधी मिळणे कठीण आहे. २०२८ मध्ये मतांचा कोटा वाढणार असल्याने इच्छुकांच्या दाव्यांचा पेच निर्माण होऊ शकतो, ही वस्तुस्थिती मी पक्षप्रमुखांसमोर आणि आघाडीच्या बैठकीत मांडली होती.”
निर्णय प्रक्रियेवर भाष्य आणि विलीनीकरणाचा संभ्रम-
आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले की, महाविकास आघाडीमध्ये कोणतेही निर्णय हे केवळ पत्रकार परिषदांमध्ये होत नाहीत, तर ते ‘मातोश्री’वर झालेल्या चर्चेनंतरच अंतिम होतात. जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी मातोश्रीवर येऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यानंतरच हा निर्णय झाला. तसेच, पक्ष विलीनीकरणाच्या संदर्भात जे काही संभ्रम पसरवले जात होते, ते आता पूर्णतः दूर झाले असून शिवसेनेची भूमिका स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. जरी आपण आपल्या भूमिकेवर ठाम होतो, तरीही काल बैठकीत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने तो निर्णय आता सर्वांसाठी शिरसावंद्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
अनुपस्थितीचे तांत्रिक कारण-
आपल्या अनुपस्थितीबद्दल स्पष्टीकरण देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शरद पवारांच्या नावाबाबत प्राथमिक घोषणा केली, त्या दिवशी आपण उदयपूर येथे होतो. तसेच, काल अर्जुनच्या विवाहाचे नियोजित कार्य असल्याने आपण उपस्थित राहू शकलो नाही. “मी नाराज असल्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही, केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मी अर्जावेळी हजर राहू शकलो नाही,” असे सांगून त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.












