Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघतात दुःखद निधन झाले आहे. बारामती येथे विमानाचे लँडिग होत असताना हा दुःखद अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की विमान जळून खाक झाले, आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चार सभा होणार होत्या. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी तसेच सुपे जिल्हा परिषद गटासाठी आयोजित सभांसाठी अजित पवार मुंबईहून विमानाने बारामतीकडे येत होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा दुर्दवी अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, यात अजित पवारांसह मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट या विमानात होते. या सर्वांचा यात दुर्दवी मृत्यू झाला आहे. मुंबईतून हे विमान सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी निघाले होते. तर, बारामती येथे ८.५० मिनिटांनी पोहोचले. लँडिंग करत असतानाच या विमानाचा दुर्दवी अपघात झाला अन् आतील सहाही जणांचा मृत्यू झाला.
राजकारणात पुन्हा घातपाताच्या चर्चांना उधाण;अजित पवारांच्या मृत्यूभोवतीही तर्कवितर्कांचे वादळ-
दरम्यान; महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे ३ जून २०१४ रोजी दिल्लीत झालेल्या एका दुर्दैवी वाहन अपघातात निधन झाले. पहाटेच्या सुमारास ते अधिकृत निवासस्थानाहून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे रवाना झाले असताना, त्यांच्या वाहनाला भरधाव कारने धडक दिली आणि या अपघातात ते गंभीर जखमी झाले. तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाले. त्या दिवशी ते मुंबईला येण्यासाठी निघाले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आणि सर्वत्र शोककळा पसरली.
गोपीनाथ मुंडे हे राज्यातील ओबीसी नेतृत्वाचा महत्त्वाचा चेहरा मानले जात होते आणि मुख्यमंत्रीपदासाठी ते एक प्रमुख दावेदार होते. मात्र त्यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाला पक्षांतर्गत व राजकीय पातळीवर विरोध असल्याची चर्चा त्या काळात होती. याच पार्श्वभूमीवर हा अपघात केवळ योगायोग नसून त्यामागे काही कटकारस्थान असावे, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आणि जनतेत रंगली. त्यांच्या मृत्यूबाबत विविध तर्कवितर्क मांडले गेले आणि अपघाताच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सुरुवातीला केली होती. काही काळानंतर त्यांनी ही मागणी मागे घेतली असली, तरी आजही त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जातो. अधिकृत तपासात हा अपघात असल्याचे नमूद करण्यात आले असले, तरी अनेकांच्या मनात अनुत्तरित प्रश्न कायम आहेत. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हा केवळ अपघात होता की त्यामागे काही वेगळे कारण होते, याविषयीची चर्चा अद्यापही संपलेली नाही.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ज्या प्रकारे विविध तर्कवितर्क आणि संशयकथांना उधाण आले होते, त्याच धर्तीवर अजित पवार यांच्या मृत्यूच्या बातमीबाबतही उलटसुलट चर्चा तात्काळ सुरू झाल्याचे चित्र दिसून आले. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे विमान अपघाताने कोसळणे हा केवळ अपघात नसून घातपाताचा प्रकार असावा, असा संशय त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी व्यक्त केला. अजित पवार हे राजकीयदृष्ट्या प्रभावी व काही घटकांना डोईजड ठरत असल्यानेच त्यांचा अपघात घडवून आणण्यात आला, अशी चर्चा काही ठिकाणी ऐकू येऊ लागली. मात्र या सर्व दाव्यांना कोणताही ठोस पुरावा किंवा अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
हे देखील वाचा – Ajit Pawar death : विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन..









