Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक अत्यंत दुःखद बातमी आज सकाळी समोर आली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत अजित पवारांसह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
डिंगच्या वेळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे विमान शेतात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून, या घटनेने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताची सखोल चौकशी होणार
या भीषण अपघातानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “आमच्या एका जवळच्या सहकाऱ्याचा जीव या दुर्घटनेत गेला आहे. यापुढे अशा प्रकारचे अपघात घडू नयेत यासाठी या प्रकरणाची सविस्तर चौकशी झालीच पाहिजे. नक्की कोणत्या कारणामुळे विमान कोसळले आणि लँडिंगच्या वेळी काय अडथळे आले, हे शोधणे गरजेचे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.”
“माझा मोठा भाऊ हरपला” – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांनी अत्यंत भावूक होत अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. “अजित दादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील असा विचार कोणाच्याही स्वप्नात आला नसेल. ते माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे होते. त्यांच्या जाण्याने मी माझा एक मोठा भाऊ गमावला आहे,” असे शिंदे यांनी म्हटले.
अजित दादांचा स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची जरब सर्वांना माहित होती. प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करूनच ते बोलत असत. पहाटे सहा वाजता कामाला सुरुवात करण्याची त्यांची शिस्त राज्यासाठी आदर्श होती. मंत्रिमंडळात काम करताना आर्थिक तरतूद आणि ‘लाडकी बहीण’ योजनेसारख्या कामांमध्ये त्यांनी दिलेले योगदान मोलाचे होते. चूक असेल तर चूक आणि बरोबर असेल तर बरोबर म्हणण्याचे धैर्य त्यांच्याकडे होते. ‘करतो, बघतो’ असे शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये कधीच नव्हते, असे ते म्हणाले.
राज्याचे न भरून येणारे नुकसान
अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची युती राज्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील होती, मात्र या घटनेने सर्व काही विस्कळीत झाले आहे. “राज्यातील अनेक विषयांचा त्यांना गाढा अभ्यास होता, त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबाचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे,” अशा शब्दांत शिंदेंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.









