Ambadas Danve : उबाठा गटाचे आमदार आणि माजी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करतील, असा खळबळजनक दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. “अंबादास दानवे आमच्या संपर्कात असून, आमच्यासोबत येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे,” असे विधान उदय सामंत यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी मैदानावर आयोजित कार्यक्रमात शिंदे गट आणि उबाठा गटाचे नेते एकत्र आले होते. या कार्यक्रमात खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे आणि मंत्री संजय शिरसाट हे एकाच रांगेत बसलेले दिसून आले. विशेष म्हणजे कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
या घडामोडींनंतर मंत्री उदय सामंत यांनी अंबादास दानवे शिंदे गटात येणार असल्याचा दावा केल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा याआधीपासूनच होती. खैरेंना उमेदवारी मिळाल्याने दानवे नाराज असल्याचे बोलले जात होते.
तसेच, छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला केवळ सहा जागा मिळाल्यानंतर पक्षांतर्गत आरोप-प्रत्यारोप वाढले. महापालिकेतील पराभवासाठी चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवेंवर आरोप करत पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात अंतर्गत कोंडी निर्माण झाली असताना, उदय सामंत यांच्या वक्तव्यामुळे दानवे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत हे आरोप फेटाळले आहेत. “अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी आजपर्यंत पक्ष बदललेला नाही. ते आमचे सहकारी आहेत. या दाव्यांना काहीही अर्थ नाही,” असे राऊत म्हणाले. तसेच, “स्वतः उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपात जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. दावोस येथे काय चर्चा झाली, हे सर्वांना माहीत आहे,” असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.









