Ashok Kharat Crime News : तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि आध्यात्मिक गुरूचा बुरखा पांघरून महिलांचा विश्वासघात करणाऱ्या अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या कृत्यांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी शासनाने आता विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली असून, आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे या पथकाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. या निर्णयामुळे खरातचे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील धागेदोरे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिरगाव येथील फार्म हाऊसवर मध्यरात्री छापा-
नाशिक गुन्हे शाखेने (Crime Branch) सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील खरातच्या फार्म हाऊसवर मध्यरात्री मोठी कारवाई केली. या छाप्यात पोलिसांच्या हाती अत्यंत धक्कादायक पुरावे लागले आहेत. झडतीदरम्यान पोलिसांना तेथे एक पिस्तूल आणि काही जिवंत व वापरलेली काडतुसे सापडली आहेत. शस्त्रास्त्रांव्यतिरिक्त, खरातच्या विविध मालमत्तांचे दस्तावेज आणि काही संशयास्पद कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. या कारवाईमुळे खरातचा वावर केवळ भोंदूगिरीपुरता मर्यादित नसून त्याचे गुन्हेगारी क्षेत्राशीही संबंध असण्याची शक्यता बळावली आहे.
नेमकी पार्श्वभूमी आणि ‘कॅप्टन’चा मुखवटा-
अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील सेवानिवृत्त अधिकारी असल्याचे सांगत असे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या माहितीनुसार, त्याने २२ वर्षांच्या नोकरीत १५४ देशांचा प्रवास केला असून तेथील विविध संस्कृती आणि धार्मिक परंपरांचा सखोल अभ्यास केल्याचा त्याचा दावा होता. याच ज्ञानाचा वापर करून त्याने नाशिकमध्ये ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. अनेक बडे नेते, सेलिब्रिटी आणि नामवंत उद्योजक आपल्या भविष्यातील अडचणींवर उपाय शोधण्यासाठी त्याच्या दरबारात हजेरी लावत असत. तो मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होता.
शोषणाचे अघोरी स्वरूप-
खरातवर एका ३५ वर्षीय महिलेने गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. धार्मिक विधी आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर त्यांच्या असहायतेचा फायदा घ्यायचा, अशी त्याची कार्यपद्धती असल्याचे समोर आले आहे. १८ मार्च रोजी पहाटे सरकारवाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान हस्तगत करण्यात आलेल्या ५८ व्हिडिओमुळे हे प्रकरण केवळ एका महिलेपुरते मर्यादित नसून, यात अनेक प्रतिष्ठित महिलांचे शोषण झाले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एसआयटीमुळे बड्या नावांचे धाबे दणाणले-
राजकीय वर्तुळात खरातचा मोठा वावर असल्याने या प्रकरणाचा तपास दबावाखाली होऊ नये, यासाठी सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. तेजस्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आता खरातच्या आर्थिक व्यवहारांची, बेकायदेशीर मालमत्तांची आणि पीडित महिलांच्या तक्रारींची सविस्तर चौकशी केली जाईल. या तपासामुळे समाजातील उच्चभ्रू वर्तुळातील अनेक चेहेरे समोर येण्याची शक्यता असल्याने सध्या नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.










