BUS Accident : धारावी-माहीम परिसरातील काळा किल्ला आगारात ‘मातेश्वरी’ या कंत्राटी कंपनीच्या बसने संरक्षक भिंतीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बेस्टचे दोन कर्मचारी आणि कंत्राटी कंपनीचा एक कर्मचारी असे एकूण तिघे जण जखमी झाले आहेत. बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे बेस्टच्या खासगी कंत्राटी पद्धतीतील त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत.
बेस्टच्या शिस्तीचा बोजवारा: नितीन नांदगावकर यांचा आरोप-
या अपघाताची माहिती मिळताच शिवसेना (उबाठा) नेते नितीन नांदगावकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘मातेश्वरी’ कंत्राटदारावर आणि बेस्ट प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “काळा किल्ला आगारातील या घटनेने हे स्पष्ट झाले आहे की, कंत्राटी कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षणाची नितांत गरज आहे. एकेकाळी शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या बेस्टचा आज पूर्णपणे बोजवारा उडाला आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
नादुरुस्त गाड्या आणि कर्मचाऱ्यांवरील दबाव-
नांदगावकर यांनी आपल्या पोस्टमध्ये कंत्राटी कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, धारावी आगारातील गाड्यांच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे. अनेक गाड्या नादुरुस्त अवस्थेत असूनही त्या रस्त्यावर उतरवण्यासाठी चालकांवर दबाव टाकला जातो. गाड्यांच्या देखभालीकडे (Maintenance) कंत्राटदारांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचा आणि कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशासनाला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा-
या प्रकरणी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषी कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे. “जर वारंवार सांगूनही परिस्थितीत सुधारणा होत नसेल, तर संबंधित अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, या संदर्भात ‘बेस्ट कामगार सेना’ लवकरच प्रशासनाला जाब विचारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.











