Cabinet Decision : राज्यत सध्या २९ महापालिका निवडणुकींची धामधूम जोरदार सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक पक्ष राजकीय रणनितीमध्ये व्यग्र असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारच्या कॅबिनेटने ४ महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
राज्य सरकारचे चार महत्वाचे निर्णय खालीलप्रमाणे
१. ग्राम, तालुका, जिल्हा प्रशासनाच्या सक्षमीकरणासाठी कर्मयोगी २.०, सरपंच संवाद कार्यक्रम राबवणार.
ग्राम, तालुका आणि जिल्हास्तरावर विकासाभिमुख कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यात जिल्हा कर्मयोगी कार्यक्रम २.० तसेच राज्यातील सरपंचांच्या क्षमता विकसित करण्यासाठी सरपंच संवाद कार्यक्रम राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
२. राज्यातील २९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार
राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत तसेच सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित २९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याबाबत विभागीय आयुक्तांना अधिकार देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. तसेच या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
३. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी धाराशिवमध्ये जागा
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी धाराशिव नगरपरिषदेला शहरातील दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
४. अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार
नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व आणि मताचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय देखील आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
दिल्ली मेट्रोच्या विस्तारीकरणला केंद्रीय मंत्रिमंडळाची अखेर मंजुरी
राजधानी दिल्लीतही केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत दिल्ली मेट्रोच्या १२ हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात दिली गेली. त्यात १३ नवीन स्टेशन देखील असणार आहेत. ज्यामध्ये, १० अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आणि ३ उड्डाण स्टेशन देखील असणार आहेत. राजधानी दिल्लीतील हा १६ किलोमीटरचा प्रकल्प पुढील ३ वर्षात सर्वोतोपरी पूर्ण होईल. या निर्णयामुळे दिल्लीतील मेट्रोचं जाळ आता ४०० किलोमीटरचा टप्पा देखील ओलांडणार आहे.









