Decision To Keep Phones And TVs Off : सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत पुन्हा एकदा राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. गावातील विद्यार्थ्यांचा अभ्यास, आरोग्य आणि उज्ज्वल भवितव्य लक्षात घेता अनगर नगरपंचायतीने एक अभिनव आणि धाडसी निर्णय घेतला आहे. दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत संपूर्ण गावात मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायतीने जाहीर केला आहे.
अनगर नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करत असल्याची बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत आणि एकाग्र वातावरण मिळावे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी सांगितले की, मोबाईल आणि टीव्हीमुळे मुलांचा अभ्यासाकडे असलेला कल कमी होत आहे. याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह आरोग्यावरही होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या वेळेत मोबाईल व टीव्हीऐवजी अभ्यास, वाचन आणि कुटुंबासोबत संवाद साधावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हा निर्णय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जाहीर करण्यात आला असून, ग्रामस्थांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे. अनेक पालकांनी हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगत नगरपंचायतीचे कौतुक केले आहे. गावात शिस्त, एकाग्रता आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान अनगर नगरपंचायतीची निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून घेतलेल्या या निर्णयामुळे अनगर नगरपंचायत राज्यभरात चर्चेत आली आहे.









