Home / महाराष्ट्र / Pune News: पुण्याच्या वाहतूक कोंडीवर मुख्यमंत्र्यांचा ‘पाताळ लोक’ प्लॅन!

Pune News: पुण्याच्या वाहतूक कोंडीवर मुख्यमंत्र्यांचा ‘पाताळ लोक’ प्लॅन!

Pune News: पुणे शहराचा वाढता विस्तार आणि दररोजची वाहतूक कोंडी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ऐतिहासिक...

By: Team Navakal
Pune News
Social + WhatsApp CTA

Pune News: पुणे शहराचा वाढता विस्तार आणि दररोजची वाहतूक कोंडी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ऐतिहासिक ‘पाताळ लोक’ प्रकल्पाची घोषणा केली आहे.

पुण्यातील प्रचारसभेत बोलताना त्यांनी शहरासाठी ५४ किलोमीटर लांबीचे चौपदरी भुयारी मार्ग तयार करण्याचा संकल्प जाहीर केला. जमिनीवर जागा नाही आणि उड्डाणपुलांमुळे आकाशातही जागा उरली नाही, म्हणून आता थेट ‘पाताळात’ म्हणजेच जमिनीखाली रस्ते बांधण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काय आहे ‘पाताळ लोक’ प्रकल्प?

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पुणे शहरात ५४ किलोमीटरचे भुयारी रस्ते बांधले जाणार आहेत. यासाठी सुमारे ३२,००० कोटी रुपये खर्च केले जातील. यातील पहिला टप्पा कात्रजपासून सुरू होणार असून, हा मार्ग येरवडा, स्वारगेट, सिंहगड रस्ता, पाषाण, खडकी, कोथरूड, औंध आणि संगमवाडी यांसारख्या गजबजलेल्या भागांना जोडणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकल्पाचा संपूर्ण नकाशा आणि तांत्रिक आराखडा आधीच तयार करण्यात आला आहे.

पुण्याच्या विकासासाठी ‘ट्रिपल डेकर’ व्हिजन

केवळ भुयारी रस्तेच नव्हे, तर पुण्याच्या वाहतुकीला गती देण्यासाठी इतरही अनेक योजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली:

  1. रिंग रोड: १६९ किमी लांबीच्या रिंग रोडसाठी ५७,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील १२ पैकी ९ पॅकेजचे काम सुरू झाले असून, यामुळे पुण्यातील अंतर्गत वाहतूक ४० टक्क्यांनी कमी होईल.
  2. डबल डेकर पूल: पुणे-नगर, पुणे-सोलापूर आणि पुणे-नाशिक या मार्गांवर दुमजली पूल बांधले जातील. ज्यामध्ये खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो धावेल.
  3. इलेक्ट्रिक बसेस: शहरासाठी ४,००० नवीन इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  4. एआय तंत्रज्ञान: वाहतूक नियमनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून कोंडी सोडवण्याचे उपाय शोधले जाणार आहेत.

शहरातील ३२ महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि १३ नवीन उड्डाणपुलांची निर्मिती हे देखील या ‘व्हिजन’चा भाग आहेत. दोन दशकांपूर्वी जे नियोजन व्हायला हवे होते, ते आता भाजप सरकार पूर्ण करत असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. या ‘पाताळ लोक’ संकल्पनेमुळे पुणेकरांच्या जलद प्रवासाच्या आशा पल्लवित झाल्या असून, शहरात या प्रकल्पाची जोरदार चर्चा रंगली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या