Shahajibapu patil- सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या (Shahajibapu patil) कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेने आज धाड टाकली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगोल्यातील प्रचारसभेनंतर काही तासांतच झालेल्या छापेमारीमुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चव्हाट्यावर आले. धाडीनंतर शहाजीबापू पाटील यांनी यामागे भाजपाचे दीपक साळुंखे असल्याचा थेट आरोप केला. प्रचाराचा कालावधी संपण्याच्या एक दिवस आधीच ही कारवाई झाल्याने त्यांना रडू कोसळले. दरम्यान, सांगोल्यातील शेकाप, राष्ट्रवादी आणि भाजपाच्या कार्यालयांवरही छापे पडल्याची माहिती आहे. या कारवाईवेळी पथकाने व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तपासणी केली.
शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, काल नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सांगोल्यात शिवसेनेची शेवटची जाहीर सभा झाली. त्यानंतर मी कार्यालयात गेलो. थोडी एक दहा मिनिटे खुर्चीवर झोप काढून घरी जाण्याचा विचार करत होतो. मला काही समजायच्या आत खासगी कपड्यात पाच-सहा लोक ऑफिसमध्ये दाखल झाले. तुम्ही बसून राहा. आम्हाला तपासणी करायची आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांना मी सांगितले की, मला गोळ्या घ्यायच्या आहेत, मला जाऊ द्या. त्यांनी मला तीन-चार तास बसवून ठेवले. कार्यकर्ते, पत्रकारही त्याठिकाणी होते. त्यांनाही रोखून धरले. 1952 पासून येथे निवडणुका होत आहेत. तेव्हापासून पहिल्यांदा असे घडले आहे. वेदना झाल्या, काय करावे? आज मी राजकारणातून संन्यास जाहीर करण्याच्या मानसिकतेत आहे. चार-आठ दिवस वाट बघून वरिष्ठांशी चर्चा करणार आहे. मला कधीच कोणी साथ दिली नाही. परंतु ज्या पद्धतीने मला खेळवले, जागावाटप करायचे आहे, एकत्र चर्चा करू असे सांगून मला अर्ज भरेपर्यंत अंधारात ठेवले. ऐनवेळी मला युती जुळत नसल्याचे कळवले. 12 उमेदवार तयार होते. कसेतरी पॅनल उभे केले.
ते पुढे म्हणाले की, या कारवाईमागे दीपक साळुंखे यांचा हात आहे. ते रोज मुंबईला जाऊन सर्व पक्षांच्या कार्यालयात जाऊन बसतात. परंतु कोणत्याही पक्षाने त्यांना प्रवेश दिलेला नाही. आता ते मंत्री जयकुमार गोरे यांचे सल्लागार झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस असे पाप करणारा माणूस नाही. याची मला 99 टक्के शाश्वती आहे. हे सर्व स्थानिक नेत्यांचे कारस्थान आहे. जयकुमार गोरे माझा ज्येष्ठ म्हणून सन्मान करतात. परंतु दीपकच्या नादी लागून ते का बिघडले हे समजत नाही. आताची निवडणूक होऊन जाईल. परंतु पुढच्या सर्व निवडणुकांवर त्याचा परिणाम होईल. येथे लोकसभेत भाजपा उभे राहिले तर मी लोकांकडे कमळासाठी कसे मत मागू? याची जबाबदारी आता जयकुमार गोरे यांनी घ्यावी. सांगोल्याच्या मतदारांनी स्वाभिमान जागृत ठेवावा असे आवाहन करतो.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला याची कल्पना नाही. पण कुणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे यावरून धाड ठरत नाही. आमच्याही एखाद्या कार्यकर्त्याविरोधात तक्रार आली तर त्याचीही प्रकरणात चौकशी होते. माझीही गाडी अनेकवेळा तपासली जाते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे फारसे गंभीर प्रकरण नाही.
हे देखील वाचा-
हॅलो, एमआयडीसी मंजूर करा! शिंदेंची विरोधकांकडून खिल्ली








