गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर, आता थेट रेल्वेतून कार घेऊन जाता येणार; खर्च आणि नियम जाणून घ्या

Konkan Railway Ro-Ro Service

Konkan Railway Ro-Ro Service: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून कोकणात जाताना थेट रेल्वेतून कार (Konkan Railway Ro-Ro Service) घेऊन जाता येणार आहे.

कोकण रेल्वेने घोषणा केली की, आगामी गणपती उत्सवादरम्यान खासगी गाड्यांसाठी विशेष रोल ऑन-रोल ऑफ म्हणजेच ‘रो-रो’ रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे. 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रातील कोलाड आणि गोव्यातील वेर्णा दरम्यान ही सेवा धावणार आहे.

‘रो-रो’ सेवेची वैशिष्ट्ये आणि भाडे

‘रो-रो’ कार सेवेसाठी खास तयार करण्यात आलेल्या रेकमध्ये एका फेरीत 40 गाड्या नेता येतील. 20 वॅगनवर प्रत्येकी दोन गाड्या चढवल्या जातील, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे. कोलाड येथून 23 ऑगस्टला आणि वेर्णा येथून 24 ऑगस्टला या सेवेची सुरुवात होईल.

या ‘रो-रो’ सेवेद्वारे आपली कार नेण्यासाठी वाहनमालकांना वस्तू आणि सेवा करासह 7875 रुपये मोजावे लागतील. आरक्षणाच्या वेळी सुरुवातीला 4000 रुपये भरावे लागतील, तर उर्वरित रक्कम प्रवासाच्या दिवशी द्यावी लागेल. प्रत्येक कारसोबत जास्तीत जास्त तीन व्यक्तींना संलग्न तृतीय श्रेणी वातानुकूलित किंवा द्वितीय श्रेणी आसनाच्या डब्यातून प्रवास करण्याची परवानगी असेल. यासाठी प्रत्येक व्यक्तीला निर्धारित भाडे द्यावे लागेल, जे तृतीय श्रेणी वातानुकूलितसाठी 935 रुपये आणि द्वितीय श्रेणी आसनासाठी 190 रुपये असेल.

आरक्षण प्रक्रिया आणि प्रवासाचे वेळापत्रक

पुरेसे आरक्षण न झाल्यास (16 पेक्षा कमी गाड्यांसाठी बुकिंग झाल्यास), संबंधित फेरी रद्द केली जाईल आणि नोंदणी शुल्क पूर्णपणे परत केले जाईल. या सेवेसाठी आरक्षण 21 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान खुले राहील.

ज्यांना या सेवेचा लाभ घ्यायचा आहे, ते कोकण रेल्वेच्या बेलापूर किंवा वेर्णा येथील कार्यालयात रोख किंवा युपीआयद्वारे पैसे भरून आरक्षण करू शकतात. ही सेवा कोलाड ते वेर्णा दरम्यान असेल.

कोकण रेल्वेचा अभिनव उपक्रम

कोकण रेल्वेने 1999 मध्ये ट्रकसाठी ‘रो-रो’ सेवा सुरू करून भारतात या संकल्पनेचे नेतृत्व केले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, खासगी गाड्यांसाठी ही सेवा प्रथमच सुरू केली जात आहे.

कोकण पट्ट्यातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक असलेल्या गणपती उत्सवादरम्यान, मुंबई आणि राज्यातील इतर भागांतून लाखो लोक विविध वाहतूक साधनांनी प्रवास करतात. मात्र, राष्ट्रीय महामार्गाच्या खराब स्थितीमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत कोकण रेल्वेची ही नवीन सेवा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.