Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai Airport) लोकनेते दि.बा. पाटील (D.B. Patil) यांचे नाव द्यावे या भूमिपुत्रांच्या जुन्या मागणीसाठी पायी दिंडीचे आयोजन केले आहे. २० डिसेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास २२ डिसेंबरला भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ अशी पायी दिंडी काढली जाईल . २५ डिसेंबरपासून विमानतळावरून एकही विमान उडू देणार नसल्याचा इशारा खा. सुरेश म्हात्रे यांनी केंद्र सरकारला दिला.
राज्य सरकारने दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याचा ठराव मंजूर करून केंद्राकडे पाठवला. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप निर्णय न झाल्यामुळे भूमिपुत्र पुन्हा आक्रमक झाले आहेत. विमानतळावरून या महिन्यात उड्डाणे सुरू होणार असल्याने आता आंदोलन केले जाणार आहे. कार रॅलीनंतर आता पदयात्रेची घोषणा झाली आहे. भिवंडीतील मानकोली नाका ते नवी मुंबई विमानतळ या मार्गावर दि.बा. पायी दिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीचे समन्वयक निलेश पाटील यांनी या पदयात्रेचा सविस्तर मार्ग जाहीर केला.
यानुसार २२ डिसेंबर रोजी सकाळी मानकोली नाका, भिवंडी येथून पायी दिंडी निघणार आहे. सुरुवातीला किमान २५ हजार भूमिपुत्र सहभागी होतील. दुपारच्या भोजनासाठी ठाण्यातील खारेगाव येथे विसावा घेतला जाईल. त्यानंतर सायंकाळी सुमारे १५ किमी अंतर पार करून ऐरोली येथे मुक्काम केला जाईल. दिंडीत सहभागी महिलांसाठी सायंकाळी घरी परतण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. २३ डिसेंबर रोजी ऐरोलीहून दिंडी पुन्हा मार्गस्थ होऊन १५ किमी अंतर पार करत सीबीडी बेलापूर येथे मुक्काम करील . २४ डिसेंबर रोजी अंतिम टप्प्यात रायगड, ठाणे, पालघर व मुंबई जिल्ह्यातील भूमिपुत्र हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन विमानतळ परिसरात एकत्र येणार आहेत.









