Maharashtra Cold Wave : भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील हवामानाबद्दल एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. पुढील तीन दिवसांत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये थंडीची लाट येणार असून, रात्रीच्या किमान तापमानात मोठी घसरण अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
राज्यातील ‘या’ भागांना थंडीचा विळखा
17 नोव्हेंबर रोजी नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेमुळे किमान तापमानात मोठी घट दिसून येईल.
उत्तर महाराष्ट्रात कडाका: जळगावमध्ये 15 आणि 16 नोव्हेंबरसाठी ‘यलो अलर्ट’ आहे. तर नाशिकमध्ये 16 नोव्हेंबर रोजी तापमान 8°C पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात गारठा वाढणार: पुढील तीन दिवस मराठवाड्यात थंडीच्या लाटेची स्थिती राहील. छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 नोव्हेंबरला ‘यलो अलर्ट’ असून, 15 नोव्हेंबरला किमान तापमान 11°C पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
विदर्भात तीव्र थंडी कायम: विदर्भातील नागपूर आणि अमरावतीसारख्या शहरांमध्ये किमान तापमान सुमारे 12°C पर्यंत खाली येऊ शकते. आकाश स्वच्छ असल्याने आणि हवा कोरडी असल्याने थंडीची तीव्रता जास्त जाणवेल.
राज्याच्या बहुतांश भागात पारा घसरत असताना, मुंबईकरांना मात्र अजूनही अपेक्षित थंडीचा अनुभव आलेला नाही. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर किमान तापमान सुमारे 19°C राहील आणि हवामान स्वच्छ राहील.
दुसरीकडे, पुण्यामध्ये किमान तापमान 12°C आणि कमाल तापमान 30°C च्या दरम्यान राहील. आगामी काळात पुण्यातील थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये किमान तापमान 18°C तर कमाल तापमान 30°C च्या आसपास असेल.
हवामान विभागाचे नागरिकांना आवाहन
हवामान शास्त्रज्ञांनी नागरिकांना पुढील तीन दिवसांसाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी किमान तापमान 7°C ते 8°C पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. विशेषतः सकाळच्या आणि रात्रीच्या वेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे प्रशासनाने सूचित केले आहे.
हे देखील वाचा – Bihar Election Results : नदीत उड्या, डान्स केला पण… बिहार निकालावरून फडणवीसांनी साधला राहुल गांधींवर निशाणा









