Maharashtra Farmer Task Force: महाराष्ट्रातील बळीराजाला आर्थिक आणि मानसिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणे आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागातर्गत राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारचा समर्पित टास्क फोर्स तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
तज्ज्ञांची नियुक्ती आणि टास्क फोर्सची रचना
कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार, या टास्क फोर्सचे अध्यक्षपद विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नाईकवाडी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. यामध्ये गेल्या १० वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर काम करणारे आंतरराष्ट्रीय कृषी समाजशास्त्रज्ञ डॉ. विनायक हेगणा यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. हेगणा यांनी आपल्या ‘शिवार संसद’ आणि ‘शिवार हेल्पलाईन’च्या माध्यमातून आतापर्यंत २,४९८ शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखले आहे.
टास्क फॉरची प्रमुख उद्दिष्टे:
- संशोधन आणि अभ्यास: शेतकरी आत्महत्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि विशेषतः मानसिक कारणांचे सखोल संशोधन करणे.
- हवामान बदल: बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम अभ्यासून त्यावर उपाययोजना सुचवणे.
- एकात्मिक मॉडेल: कृषी तंत्रज्ञान, आर्थिक मदत आणि मानसिक आरोग्य सेवा यांचा मेळ घालून एक नवीन कार्यपद्धती विकसित करणे.
- पुनर्वसन: नैसर्गिक आपत्तीनंतर शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम तयार करणे.
- जिल्हास्तरीय समन्वय: जिल्हा आणि विभाग स्तरावर या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आराखडा तयार करणे.
प्रशासकीय भूमिका
कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले की, शेतकरी आत्महत्यांकडे केवळ नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टिकोनातून न पाहता, विविध योजनांचा समन्वय साधून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा या टास्क फोर्सचा मुख्य उद्देश आहे. अध्यक्ष रफिक नाईकवाडी यांनी सांगितले की, यापूर्वीच्या समित्यांनी केलेल्या शिफारसींचा आढावा घेऊन बदलत्या काळानुसार नवीन धोरणे राबवली जातील.
डॉ. विनायक हेगणा यांनी विकसित केलेले ‘पिरॅमिड मॉडेल’ या टास्क फोर्सच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.














